Jalna Farmers On MLA Gorantyal : जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचा मोबदला आलाच नाही तर घोटाळा झाला कुठं? शेतकऱ्यांचा आमदार गोरंट्याल यांना सवाल - समृद्धी महामार्गाचा मोबदला
🎬 Watch Now: Feature Video

जालना : जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा अजूनही आम्हाला मोबदला मिळाला नाही. मग आमदार गोरंट्याल यांना 500 कोटी रुपयांचा घोटाळा दिसलाच कुठे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आज समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. आम्ही चोर असल्याचा उल्लेख काल गोरंट्याल यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडताना केला. 'आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा' असे गोरंट्याल विधानसभेत म्हणाले. आम्ही चोर नसून जगाचे पोशिंदे आहोत. आम्ही पिकवणे बंद केल्यास तुम्हाला भाकरीला देखील दाणे मिळणार नाहीत, अशी टीका यावेळी शेतकऱ्यांनी गोरंट्याल यांच्यावर केली. आमदार गोरंट्याल हे शेतकऱ्यांवर खोटे आरोप करत असून आमच्या पोटावर पाय देत आहेत. या महामार्गासाठी सगळ्या आमदारांनी पत्र दिले आहे; मात्र आमदार गोरंट्याल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने पत्र दिले नाही. त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यांनी आजपर्यंत विधानसभेत एकही प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूने उपस्थित केला नाही. आम्हाला भीक लागत नसून आमचा हक्क पाहिजे, असेही यावेळी शेतकऱ्यांनी गोरंट्याल यांना ठणकावले.