महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला, तर त्याचा कार्यक्रमच होणार", एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्राची भरभराट झाल्याचा दावा करणारे रिपोर्ट कार्ड सरकारनं जाहीर केले. संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 2 hours ago

Mahayuti gov releases report card
महायुती सरकार रिपोर्ट कार्ड (Source- ETV Bharat Reporter)

मुंबई-महायुती सरकारच्या काळात विविध क्षेत्रांतून राज्याचा विकास झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संयुक्त परिषदेत करण्यात आला. यावेळी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही आमच्या दोन-सव्वा दोन वर्षाच्या कामाचं रिपोर्ट कार्ड आपल्यासमोर मांडलं आहे. हे कार्ड मांडण्यासाठी हिंमत लागते. पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात सर्व महत्वाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती. मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिल्याने १७ हजार कोटी जास्त खर्च झाले. अन्यथा आम्ही लाडक्या बहिणींना अधिक पैसे देऊ शकलो असतो.

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat Reporter)

९०० निर्णय घेतले :महाराष्ट्रातील उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक नवीन प्रकल्प सुरू आहेत. कल्याणकारी योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करतो. आम्हाला 'कॉमन मॅन'ला 'सुपरमॅन' बनवायचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली आहे. ऑक्टोंबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले. बळीराजा वीजबिल माफ योजना सुरू केली. शेतकऱ्यांना ४६ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. आम्ही खोटी आश्वासन दिली नाहीत. शासन आपल्या दारी योजना सुरू केली. त्यातून ५ कोटी लोकांना लाभ मिळाला. जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना त्यांनी बंद केली. त्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत.

आम्ही स्पीड ब्रेकर टाकणारे नाही, तर काढणारे आहोत. त्यांच्या काळात अडीच वर्षात राज्य फार मागे गेले. आमचं सरकार आलं नसत तर राज्य अजून मागे गेलं असतं. आम्ही ६०/ ७० कॅबिनेट बैठकीत ९०० निर्णय घेतले. विरोधकांची यापूर्वीच पोल खोल झाली आहे. लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला तर त्याचा कार्यक्रमच होणार आहे-मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे

देशाच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, त्यांच्यासाठी ऐलान झाला आहे. महाराष्ट्रात पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना आणली. ही योजना भविष्यातसुद्धा सुरू राहील. मागेल त्याला सौर पंप देण्यात येत आहेत. सिंचन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करण्यात आली आहे. १४५ प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यामुळे २२ लाख ७३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र तयार होणार आहे. समाजातील सर्व घटकांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळातून १ लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याच काम केलं आहे. पायाभूत सुविधांमध्ये प्रभावी काम या सरकारने केले आहे. वाढवण बंदर महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था चालवणार आहे."

विरोधक गोंधळात- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. उपमुख्मयंत्री म्हणाले, "आमचा विरोधी पक्ष एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून टीका करतो. दुसरीकडे त्यांचं सरकार आल्यावर अधिक पैसे देऊ. यावरून त्यांचा खरा चेहरा दिसून येतो. काँग्रेस पक्षाचे नेते लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पोहचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, त्यांचे सरकार आल्यावर ते सर्व योजना बंद करतील. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे गृहमंत्री तुरुंगामध्ये गेले. ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलत आहेत."

राज्य सरकारनं कुठलीही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई केली आहे. केवळ नरेटीव्ह तयार करणे एवढा एकमेव उद्देश विरोधकांचा आहे. देशाच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. आम्ही गुंतवणुकीत देशात नंबर वन आहोत-उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

अडीच कोटी लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे जमा-उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, " कालच निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली आहे. आमच्या समोरची लोक सातत्यानx फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आम्ही आमच्या २०२२ पासूनच्या कामांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलं. निवडणुका होत असताना शेवटच्या तीन-चार मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होत असतात. तसे आम्ही निर्णय घेतले.

दोन पानाच्या रिपोर्ट कार्डमध्ये महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्राला सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात आम्ही आणलेल्या बदलाचा हा अहवाल आहे-उपमुख्यमंत्री, अजित पवार

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही-लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य अर्थमंत्री पवार यांनी केले. अर्थमंत्री पवार म्हणाले," मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फार पॉप्युलर झाली. त्याबाबत सुद्धा विरोधकांनी अपप्रचार केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असताना त्यावरही टीकाटिप्पणी केली. आमचे विरोधक गडबडलेले आहेत. अडीच कोटी लाडकी बहिणींच्या खात्यात प्रत्येकी साडेसात हजार रुपये आले आहेत. या योजनेसाठी वर्षासाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना अतिशय विचारपूर्वक आणली आहे. ही कधीही बंद होणार नाही. सुशील कुमार शिंदे यांचं सरकार येण्यापूर्वी मोफत वीज देण्याची घोषणा केली. परंतु नंतर ती योजना बंद झाली. पण या योजनेबद्दल कदापि असं होणार नाही."

हेही वाचा-

  1. 'झिरो टू हिरो'! 1962 साली शून्य जागा जिंकणारा भाजपा आता आहे 'किंगमेकर'
  2. विधानसभेचा सारीपाट निवडणूक आयोगानं मांडला, एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल
  3. विधानसभा निवडणुकीची घोषणा, पण राजकीय समीकरण बदलल्याने सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ
Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details