मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री गोळीबार झाल्यानंतर देशभरात पडसाद उमटले आहेत. तीन अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. तसंच वाय दर्जाची सुरक्षा असतानाही ही घटना घडली. त्यामुळं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया :या घटनेवरुन आता काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की, "बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. या भयंकर घटनेमुळं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, हे सिद्ध झालं. सरकारनं या घटनेची जबाबदारी घेत सिद्दिकी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा."
दोषींवर कठोर कारवाई करा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच आरोपींना लवकरात लवकर पडकून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खरगे म्हणाले, “बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची वार्ता धक्कादायक आहे. या दु:खाच्या प्रसंगी सिद्दीकी यांचं कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करुन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी."
नाना पटोले काय म्हणाले?: या घटनेसंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले की, "ही दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र सरकार गुन्हेगारांना देत असलेल्या पाठिंब्याचा हा परिणाम आहे. हे स्पष्ट आहे की बाबा सिद्दीकी यांच्यासारखी व्यक्तीही महाराष्ट्रात सुरक्षित नाही."
हेही वाचा -
- बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तानमधील स्मशानभूमीत होणार दफन विधी
- घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय ते राष्ट्रवादीमधील वजनदार नेते; जाणून घ्या, बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास
- बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवुडमध्ये हळहळ; सलमान खान, शिल्पा शेट्टीसह 'हे' सेलिब्रिटी रुग्णालयात दाखल