महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई तुंबली पावसात; राजकारणी तुंबले आरोप-प्रत्यारोपात - Mumbai Rain

Mumbai Heavy Rain : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचं पाहायला मिळालं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्य मानत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 5:29 PM IST

Mumbai Heavy Rain
मुंबई पावसात तुंबली (ETV Bharat Reporter)

मुंबई Mumbai Heavy Rain : राज्यासह मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईची तुंबई झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वे, रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईकरांची दयनीय अवस्था झाली, यावरुन मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरू केलं आहे.

आमदार आशिष शेलार (ETV Bharat Reporter)
मुख्यमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नाचं गांभीर्य नाही : एकंदरीत राज्याची सध्याची परिस्थिती आणि पावसानं झालेला हाहाकार यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की, सत्तेचा माज महायुती सरकारला आलेला आहे. मुख्यमंत्री हा काही गंभीर माणूस नाही. पहिला असा मुख्यमंत्री आहे ज्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. महाराष्ट्राच्या चाव्या चुकीच्या माणसाच्या हाती आहेत. थोड्याशा पावसानं मुंबईकरांचे इतके हाल झाले आहेत तर पुढं अजून बराच पाऊस बाकी आहे. नालेसफाईची कुठलीच कामं झालेली नसून हे सरकार फक्त बढाया मारण्यात हुशार आहे. प्रत्येक कामात 40 टक्के कमिशन खाणारं हे सरकार आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. तर या विषयावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "आज पावसानं मुंबईची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्यासाठी सत्ताधारी आणि महानगरपालिका जबाबदार आहे. यांना राज्याचं व्यवस्थापनच जमत नाही. आज जर राज्याचे मंत्रीच प्रवासात अडकत असतील तर इतरांचं काय? एकूणच राज्याचा कारभार अशा लोकांच्या हातात आहे, ज्या सरकारच्या हाती काही करण्याची क्षमताच नाही. अपयशी सरकार अशी या सरकारची ओळख निर्माण झाली आहे."


नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा :विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार म्हणाले, "आजच्या परिस्थितीसाठी कंत्राटदारांना जबाबदार ठरवलं पाहिजे. लोकसभा निवडणूक संपल्याच्या दुसऱ्या दिवशी मी मतदार संघातील सर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी करायला जागेवर पोहोचलो होतो. तेव्हाच मी सांगितलं होतं, पालिका प्रशासन नालेसफाईचे जे आकडे देत आहे ते फसवे आणि फुगवून सांगितले जात आहेत. त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही. छोटे नाले, मोठे नाले, सौम्य वॉटर ड्रेन यातून काढलेला गाळ ज्या भूमीवर टाकला जातो ती खासगी क्षेपणभूमी आहे. त्याचा हिशेब नाही त्याचा व्हिडिओ नाही. त्याची पडताळणी नाही, म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जी केली आहे." याचबरोबर, कंत्राटदारानं चोरी केली आहे. गेल्या 25 वर्षात ठाकरे सेनेनं मुंबई महानगरपालिकेत पावसात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणे आवश्यक होत्या त्या गोष्टीवर पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्याचे हे परिणाम आहेत की आज मुंबईतल्या 27 आउटफॉलपैकी जवळजवळ 19 आउट फॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

हेही वाचा :

  1. मुंबई पुन्हा तुंबली; पावसाला तोंड देण्यास बीएमसी आणि रेल्वेची यंत्रणा अपयशी - Mumbai Heavy Rain
  2. मुंबईच्या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही बसला फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅकवरुन पायी प्रवास - Mumbai Rain

ABOUT THE AUTHOR

...view details