अहमदनगर (राहुरी) Sharad Pawar:निळवंडे धरणाचे पाणी आम्ही दिले म्हणून श्रेय घेणाऱ्या विखेंच्या वडिलांनी धरणाला विरोध केला होता, अशी टीका करत सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केलं, असा आरोप शरद पवार यांनी आज (25 एप्रिल) राहुरी येथे आयोजित सभेत केला आहे.
विखेंचं हेच धोरण :नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची आज राहुरीमध्ये सभा पार पडलीय. या सभेत उमेदवार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखेच्या कुटील राजकीय डावांचा उल्लेख करत विखेंनी जिल्ह्यातील अनेक संस्था बंद पाडण्याचं काम केल्याचा उल्लेख केलाय. तोच धागा पकडत शरद पवार यांनीही विखे पिता, पुत्र यांची या जिल्ह्यात पन्नास वर्षांपासून सत्ता असल्याचा उल्लेख केला; मात्र यांनी विकास काय केला अण्णासाहेब शिंदे, धनंजय गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला; परंतु सातत्यानं विखेंच्या पुढच्या पिढीने त्या कारखान्याची काय अवस्था केली आहे. एकेकाळी प्रसाद तनपुरेंनी सुस्थितीत चालविलेला राहुरी कारखानाही विखेंनी बंद पाडला. चांगल्या संस्था चालू द्यायच्या नाही हेच विखेंचं धोरण राहीलं, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.