महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 8:03 PM IST

ETV Bharat / state

कोस्टल रोडचं काम अर्धवट असताना श्रेय घेण्यासाठी उद्‌घाटन, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Aditya Thackeray Targets Govt : मुंबईतील कोस्टल रोडचं काम अर्धवट असताना श्रेय घेण्यासाठी राज्य सरकार त्याचं उद्‌घाटन करत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक विकासकामं पूर्ण झालेली असताना मुख्यमंत्र्यांकडे त्याचं उद्घाटन करायला वेळ नाही, अशी टीका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Aditya Thackeray Targets Govt
आदित्य ठाकरे

कोस्टल रोडच्या उद्‌घाटनावरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाना

मुंबईAditya Thackeray Targets Govt :अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज (26 फेब्रुवारी) विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर राजकीय वर्तुळाच चर्चा असताना आज विधिमंडळाच्या आवारात देखील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तसेच यावेळी ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.


श्रेय घेण्यासाठी घाई :आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''मुंबईतील अनेक विकासकामांचं उद्‌घाटन करण्यास सरकार वेळकाढूपणा करत आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. मात्र दुसरीकडे ज्यांचं काम अर्धवट आहे त्या कामांचं उद्घाटन करण्याची घाई सरकार करत आहे. कोस्टल रोड हा पूर्ण झालेला नाही. पण, त्याचं श्रेय घेण्यासाठी सरकार त्याचं उद्‌घाटन करत आहे.''

कोस्टल रोड हे आमचं स्वप्न: ''मुंबईत कोस्टल रोड व्हावा हे आमचं स्वप्न होतं. मुंबईतील गोखले पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. तरीपण त्याचं उद्घाटन होत नाही. मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम हे सरकार करत आहे. याची आम्ही सखोल चौकशी करू. माझ्या ट्विटनंतर आज पुलाचं उद्‌घाटन होत आहे. निर्लज्जपणाचा कळस सरकारकडून सुरू आहे. विकासकामांचं उद्‌घाटन करण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. पुण्यात पण रुबी हॉलचं काम पूर्ण आहे. पण उद्घाटन झालं नाही. नवी मुंबईतील विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव द्या, ही आमची मागणी आहे. पण अजून नाव दिलं गेलं नाही,'' अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली. पोलीस बदली आणि बढती यासाठी खोके सरकारची बोली सुरू असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला.

जरांगे पाटलांचं समर्थन नाही:मनोज जरांगे पाटील यांनी मला सलाईनमधून विष देऊन ठार मारण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता, असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला. यासह त्यांचा ऐकरी भाषेत उल्लेख केला. तसेच ''मी मुंबईला येतोय. मला अडवून दाखव,'' अशा भाषेचा वापर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका होत आहे. ''कोणीही टीका करताना भाषेचं भान बाळगलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करता येणार नाही. मात्र जी त्यांची मागणी आहे, त्याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तसंच मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन का करावं लागत आहे याचा सरकारनं विचार करावा,'' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

  1. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचा विषय गाजला!
  2. शरद पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, 23 मार्चला बारामतीतील निवास्थानी मोर्चा काढणार - नामदेव जाधव
  3. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी कार्यप्रणाली मिळतीजुळती, म्हणून..."; अजित पवारांचं जनतेला पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details