नारायणपूर (छत्तीसगड) :आयईडी बॉम्बच्या स्फोटाट 2 आयटीबीपी जवानांना वीरमरण आलं. ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजता घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. नक्षलवाद्यांनी छत्तीगडमधील बिजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला. या नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्राणघातक स्फोटात दोन जवानांना वीरमरण आलं. तर दोन पोलिसही गंभीर जखमी झालेत. जखमी जवानांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
साताऱ्यातील जवानाला वीरमरण : वीरमरण आलेल्या जवानांमध्ये अमर पवार हे महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी आहेत. तर दुसऱ्या जवानाचं नाव राजेश असं आहे. राजेश हे आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील रहिवासी आहेत. दोन्ही जवान आयटीबीपीच्या 53 व्या बटालियनमध्ये होते
गावावर शोककळा :छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आईडी स्फोटात सातारा जिल्ह्यातील खंडाळ्याचे सुपूत्र अमर शामराव पवार (वय ३६) यांना वीरमरण आलं. आयटीबीपीच्या ५३ व्या बटालियनमध्ये ते कार्यरत होते. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबातील :आयटीबीपीच्या जवानांचं संयुक्त पथक धुरबेराला निघालं असताना नक्षलवाद्यांनी आईडी स्फोट घडवून आणला. त्यामध्ये अमर पवार यांना वीरमरण आलं. ते बावडा (ता. खंडाळा, जि. सातारा) गावातील शेतकरी कुटुंबातील होते. छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये ते कार्यरत होते. स्फोटात गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या साह्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं.