अमरावती : छान पहाड, निसर्ग सौंदर्य यामुळं अनेक सिनेमांचं शूटिंग हे महाबळेश्वरला होतं. 'नाळ दोन' या चित्रपटाचं शूटिंग आम्ही माळशेज घाटात केलं. आता चार दिवस मी मेळघाट फिरलो. हा परिसर अतिशय घनदाट जंगलाचा आणि फारच सुंदर आहे. आमच्या पुढच्या चित्रपटासाठी मेळघाटमध्ये शूट करण्याचा विचार निश्चित केला जाईल असं नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी म्हटलंय. चार दिवसांच्या मेळघाट सफारीनंतर त्यांनी खास "ईटीव्ही भारत"शी संवाद साधला.
चार दिवस नॉट रिचेबल : "पहिल्या नाळ चित्रपटाची शूटिंग आम्ही भंडाऱ्याला केलं. त्यावेळी अमरावतीचे असणारे आमचे कास्ट डायरेक्टर प्रवीण इंदू यांनी मेळघाटबाबत सांगितलं होतं. मेळघाट पाहायला चला असं त्याचवेळी म्हटलं होतं. मात्र, आता आम्ही मुंबईत एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आणि जराशी सवड असल्यामुळं खास मेळघाटात फिरून आलो. मेळघाटचा परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाने वेढला आहे. आंध्र प्रदेशात माझं गाव देखील जंगलानं वेढलेलं आहे. त्यामुळं जंगल मला फार आवडतं. मेळघाटातील जंगल मात्र प्रचंड विस्तीर्ण आणि घनदाट आहे. मेळघाटच्या जंगलात मोबाईल फोनला देखील रेंज नाही. चारही बाजूंनी उंच पहाड आणि दाट जंगल अशा ठिकाणी मोबाईल फोन बंद असल्यामुळं चार दिवस आम्ही नॉट रिचेबल होतो. हा एक आगळा वेगळा अनुभव होता" असं सुधाकर रेड्डी म्हणाले.
अस्वलीच्या हल्ल्याची कहाणी ऐकून वाटली भीती : "मेळघाटात आमचा मुक्काम अतिशय दुर्गम अशा जारीदा या गावात होता. या गावात 2010 मध्ये वनरक्षक म्हणून सेवा देण्यासाठी पहिल्यांदाच पोहोचलेले अभिषेक वाकोडे यांच्यासह आश्रम शाळेतील उपमुख्याध्यापक, एक विद्यार्थी आणि गुराखी अशा चौघांना अस्वलीनं एकाच दिवशी ठार मारल्याची थरारक कहाणी ऐकली. त्यावेळी प्रचंड भीती वाटली" असं देखील सुधाकर रेड्डी यांनी सांगितलं.
सिपना पटेल पहिल्याचा आनंद : "मेळघाटात चारही बाजूंनी सागवानाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. हे संपूर्ण जंगल जणू सागवानानच वेढलेलं दिसतं. जारिदापासून काही अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या मांडू गावाच्या पलीकडं भारतातलं सगळ्यात जुनं असं सागवानाचं झाड आहे. त्याला सिपना पटेल असं म्हणतात. त्याबाबत माहिती मिळताच आम्ही सिपना पटेलला पाहायला गेलो. या ठिकाणी नदी ओलांडून जंगलात थोडं आतमध्ये पायी जावं लागतं. सिपना पटेल पाहण्यासाठी जातानाचा अनुभव आणि सिपना पटेल पाहतानाचा क्षण अविस्मरणीय आणि अतिशय आनंददायी होता", असं सुधाकर रेड्डी म्हणाले.
दुर्मीळ रानपिंगळा बघितला : "मेळघाट दौऱ्यात चौराकुंड या आणखी एका दुर्गम गावात आम्ही गेलो. त्या ठिकाणी फालतू पटेल या व्यक्तीनं आम्हाला रानपिंगळा दाखवला. रानपिंगळा हा एक दुर्मीळ पक्षी. फालतू पटेल यांनी शिळ वाजवत त्याला बोलवलं आणि घनदाट जंगलात एका वृक्षावर उडत येत रानपिंगळाने आम्हाला दर्शन दिलं हा एक आगळा वेगळा आणि सुखद अनुभव होता", असं देखील सुधाकर रेड्डी यांनी सांगितलं.
चिखलदऱ्याला पुन्हा येणार : "मेळघाट दौऱ्यात चिखलदराला आम्ही केवळ रात्रभर मुक्कामी होतो. सकाळी चिखलदरा नजिक असणारा गाविलगड किल्ला थोडाफार पाहिला आणि समजून घेतला. गाविलगड किल्ला मला पूर्ण पाहायचा आहे. तो पूर्ण समजून घ्यायचा आहे. गाविलगड किल्ल्यासह चिखलदरा पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा मेळघाटात येईन", असं देखील सुधाकर रेड्डी म्हणाले.
श्रीनिवासच्या घरी एकत्र आली नाळ टीम : मेळघाट दौऱ्यात सुधाकर रेड्डी यांच्यासोबत नाळ चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर प्रवीण इंदू सोबत होते. मेळघाटातून परतल्यावर अमरावतीत नाळ चित्रपटातील बालकलावंत चैत्या अर्थात श्रीनिवास पोकळे यांच्या घरी सुधाकर रेड्डी यांनी भेट दिली. यावेळी श्रीनिवासच्या घरी नाळ चित्रपटात छकुलीची भूमिका साकारणारी मैथिली ठाकरे आणि बच्चनच्या भूमिकेत असणारा संकेत ईटणकर आपल्या पालकांसोबत पोहोचले. श्रीनिवास पोकळे याला नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्याबाद्दल सुधाकर रेड्डी यांनी त्याचं अभिनंदन केलं. पहिल्या नाळच्या शूटिंग दरम्यान मला चैत्याच्या घरी येण्याचं निमंत्रण मिळालं होतं. मुंबईत तो आला की आम्ही नेहमीच भेटतो. मात्र, आज त्याच्या घरी येऊन त्याला भेटतो याचा खरंच आनंद होत आहे. विशेष म्हणजे आमच्या चैत्यासोबतच छकुली आणि बच्चनची देखील भेट झाली हा खरंच आनंदाचा क्षण असल्याचं सुधाकर रेड्डी म्हणाले.
हेही वाचा -