कोल्हापूर :राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं अहिल्यानगर इथल्या वाडिया मैदानावर रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या लढतीत पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा आरोप करत शिवराज राक्षे यांनं पंचांशी हुज्जत घालत लाथ मारल्याचा धक्कादायक घडला. "कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात याप्रकरणी आजी-माजी कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांनी राक्षे याच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कुस्तीत असा प्रकार निंदनीय असल्याचं सांगितलं. "यावेळी शिवराज राक्षेला माफी मागण्याची संधी होती. मात्र, शिवराज राक्षेनं माफी न मागता पंचांशी केलेलं वर्तन कुस्ती क्षेत्राच्या नावलौकिकाला न शोभणारं आहे." असं मत हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलं.
शिवराज राक्षेच्या कृतीवर आक्षेप :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेल्या वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. मल्लविद्याचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरातील आजी-माजी पैलवान आणि कुस्ती शौकिनांनीही डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या कृतीवर आक्षेप घेत कुस्ती खेळात पंचांना देवाचा दर्जा आहे त्यांना लाथ मारणे, हा प्रकार लाजिरवाना असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १९७२ साली हिंदकेसरीची गदा आपल्या नावावर करणाऱ्या दीनानाथ सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. "आम्हीही देशातील अनेक कुस्ती आखाड्यात देश आणि देशा बाहेरील मल्लांसोबत कुस्त्या खेळल्या. मैदानात पैलवानांसाठी पंच हा देव असतो. पंचांनी दिलेला निर्णय मान्य नाही, म्हणून त्यांना लाथ मारणं हे महापाप आहे. राक्षेनं केलेला प्रकार कुस्ती क्षेत्राला भूषणावह नाही. शिवराज राक्षे याच्याकडं माफी मागण्याची संधी होती. मात्र, त्यांन माफी मागितली नाही हे दुर्दैवी आहे. कुस्ती स्पर्धे दरम्यान असे प्रकार घडू नयेत यासाठी नियमांची कडक पुनर्बांधणी व्हावी" अशी अपेक्षाही हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केली.