नाशिकःविधानसभा निवडणुका जाहीर होताच तयारीतच असलेले प्रमुख राजकीय पक्षांची लगबग सुरू झालीय. घोषणा, प्रतिघोषणा, आव्हाने, प्रतिआव्हाने यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व जागा लढविण्याचे स्पष्ट संकेत देत मरगळलेल्या मनसैनिकांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता होती. परंतु महायुती आणि महविकास आघाडीतील अर्ध्याहून अधिक उमेदवार जाहीर होऊनही मनसेच्या राजगडावर अजून शांतता आहे.
मनसे वेट अँड वॉचच्या भूमिकेत:नाशिक जिल्ह्यातील मनसेची स्थिती संभ्रमावस्थेत आहे. नाशिक शहरातील चारही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास स्पष्ट झाली असून, मनसे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. दरम्यान, प्रबळ उमेदवारच मनसेला मिळेना अशी परिस्थिती स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर उभी राहिलीय. त्यापेक्षा आयता उमेदवार उभा करण्याकडे मनसेचा कल आहे. म्हणजे तिकीट न मिळालेल्या बंडखोरास आपल्या पक्षात घेऊन त्याला बोहल्यावर उभा करण्यासाठी आता धडपड सुरू आहे. वारंवार आपली भूमिका बदलती ठेवून कार्यकर्त्यांचा अंत पाहणाऱ्या राज ठाकरेच्या पक्षाला आता घरघर लागलीय. एकेकाळी तीन-तीन आमदार देणाऱ्या नाशिक शहरात मनसेला उमेदवार मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे.
या उमेदवारांना विचारणा : नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारलाय, यातील नगरसेवक दिनकर पाटील आणि शशिकांत जाधव हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असून, त्यांना मनसेकडून विचारणा झालीय, नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाकडून राहुल आहेर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने येथील इच्छुक असलेले उद्धव निमसे काहीसे नाराज झाले असून, त्यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करण्यासाठी चाचपणी केलीय, त्यांनाही मनसेकडून विचारणा झालीय.