महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाऊस लांबला तरी चिंता नाही; कोयना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक - Koyna Dam

Koyana Dam : राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्याने तळ गाठलाय. सर्वत्र भीषण दुष्काळाचं चित्र निर्माण झालंय. अशा परिस्थितीत राज्याच्या उद्योग विश्वासाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 10:56 PM IST

कोयना धरण
कोयना धरण (Etv Bharat Reporter)

सातारा Koyana Dam : कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाचं नवीन तांत्रिक वर्ष सुरु : कोयना धरणाचं १ जून ते ३१ मे हे तांत्रिक वर्ष असतं. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानुसार १ जून पासून ६७.५ टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरीत पाणीसाठा हा पुर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरलं आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक होतं. त्या तुलनेत यंदा केवळ अर्धा टीएमसी पाणी कमी आहे.

कोयना धरणात पाणीसाठा किती? : कोयना धरणात शनिवारी (दि. १ जून) सकाळी ८ वाजता एकूण १७.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातील ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा मृत मानला जातो. त्यामुळे १२.४६ इतका निव्वळ पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पायथा वीजगृहातील दोन युनिटमधून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती देखील पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. पाऊस लांबला तरी कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरेल. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. वीजनिर्मितीवर देखील परिणाम होणार नाही, अशी माहिती कोयना धरणाचे अधीक्षक अभियंता नितीश पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा :

  1. धरण उशाला, पण कोरड घशाला : 'सुखना' धरण आटल्यानं अनेक गावांची भिस्त टँकरवर - water scarcity problem
  2. पाणीटंचाईची तीव्रता वाढली, राज्यातील दहा हजार गावे आणि वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा - Water Scarcity Increased

ABOUT THE AUTHOR

...view details