महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा जागा वाटपाबाबत महायुतीत संभ्रमच? भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत - Assembly Elections 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 7:54 PM IST

Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मित्र पक्षांसोबत जागा वाटपावर विचार करतेय. अलीकडेच सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव मुंबई महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईत याबाबत बैठकांचा सपाटा सुरू आहे. भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत असून उरलेल्या जागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गट तसंच मित्र पक्ष यांना सामावून घ्यावे लागणार आहे.

Assembly Elections 2024
बावनकुळे, फडणवीस संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Reporter)

मुंबई Assembly Elections 2024:विधानसभा निवडणुकीला जेमतेम ३ महिन्यांचा अवधी उरलेला असताना सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुसंडी घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाचे राज्याचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव त्याचबरोबर सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईसह महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईत याबाबत बैठकांचा सपाटा सुरू आहे. अशामध्ये जागा वाटपाचा मुद्दा हा कळीचा ठरणार असून भाजपा २८८ जागांचा आढावा घेत आहे.

पराभवानंतर जिंकण्याची सुवर्णसंधी :लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला एकहाती बहुमत मिळवता आलं नाही; परंतु मित्र पक्षांच्या सोबतीनं नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. महाराष्ट्रात झालेला भाजपाचा पराभव भरून काढण्यासाठी भाजपाला विधानसभेची संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं भाजपा पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असून त्या पद्धतीची रणनीती आखली जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी केंद्रीय मंत्री, भूपेंद्र यादव त्याचबरोबर सहप्रभारी केंद्रीय मंत्री, अश्विनी वैष्णव मागील दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गुरुवारी भाजपा कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर शुक्रवारीसुद्धा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ जागांपैकी १५० जागांचा आढावा गुरुवारच्या बैठकीत घेतल्यानंतर १५१ ते २८८ जागांचा आढावा शुक्रवारी घेतला जाणार आहे. भाजपा राज्यात १६० ते १७० जागा लढण्याच्या तयारीत असून इतर उरलेल्या जागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस गट तसंच मित्र पक्ष यांना सामावून घ्यावे लागणार आहे.

जो जिंकेल त्याची जागा :या बैठकीबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जागा वाटपाबाबत ज्याची जिंकण्याची क्षमता त्याची जागा या आधारावर जागावाटप ठरवलं जाणार आहे. त्यासोबत सध्याच्या घडीला ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत, त्याबाबतही विचारमंथन सुरू आहे. शेवटी केंद्रीय नेतृत्व, पार्लमेंटरी बोर्ड बसून याबाबत निर्णय घेईल; परंतु महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भाजपाने कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, याबाबत आम्ही रणनीती आखत आहोत, असंही बावनकुळे म्हणाले.

जागा वाटपात कुठलेही मतभेद नाहीत :शिवसेना एकनाथ शिंदे गट विधानसभेला कमीत कमी १०० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानंसुद्धा जितक्या जागा एकनाथ शिंदे यांना दिल्या जातील तितक्या जागा आम्हालाही हव्यात अशा पद्धतीचा आग्रह धरला असल्याची माहिती आहे. एकंदरीत जागा वाटपावरून महायुतीत मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत कुठलेही मतभेद नसल्याचं सांगत आहेत. महायुतीत जागा वाटपाबाबत चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पसरवल्या जात असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

लोकसभेतील चूक सुधारणार :लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकंदरीत राज्यात केलेल्या सर्वेचा फटका हा शिवसेना एकनाथ शिंदे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही बसला. म्हणून विधानसभेसाठी दोन्ही पक्षांनी जागा वाटपासंदर्भात भाजपासोबत डील करताना सावध पवित्रा घेतला आहे. यावेळी भाजपाच्या कुठल्याही सर्व्हेवर विश्वास न दर्शवता त्यांनी स्वतःहून केलेले त्यांचे सर्व्हे आणि लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती याचा सारासार विचार करून उमेदवार ठरवले जावेत, अशी मागणी विशेषतः एकनाथ शिंदे गटाकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून भाजपाकडून ज्या चुका झाल्या, त्याचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटालाही बसला आहे. म्हणूनच भाजपाच्या प्रत्येक हालचालींकडे शिंदे, अजित पवार गटाचं बारकाईनं लक्ष आहे. अशा परिस्थितीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर काही कारणास्तव महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला तर स्वतंत्र निवडणुका लढवून सत्ता स्थापनेला पुन्हा एकत्र यायचं अशा पद्धतीचा मतप्रवाहसुद्धा निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा:

  1. आमदार जोरगेवारांचं आश्वासन हवेत विरलं; चंद्रपूरकरांचं 200 युनिट मोफतचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं - Chandrapur News
  2. लोकसभेला वाजलेल्या 'पिपाणी'चा आवाज विधानसभेत ऐकायला मिळणार नाही - EC On Pipani Symbol
  3. 'सुपरमॅन'च्या पायाखालची बहुमताची सतरंजी 'कॉमनमॅन'नं खेचली; संजय राऊतांचा भाजपला टोला - Sanjay Raut On BJP

ABOUT THE AUTHOR

...view details