पल्लेकेले IND vs SL 2nd T20I :भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळण्यात आला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत 162 धावांचं आव्हान भारताला दिलं. भारतीय संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर पावसानं बॅटिंगला सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 8 षटकात 78 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. भारतानं हे लक्ष्य सातव्या षटकाच्या आतच पूर्ण केलं. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे.
श्रीलंकेची खराब फलंदाजी :नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं 9 विकेट गमावून 161 धावा केल्या. कुसल परेरानं संघाकडून 34 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर पथुम निसांकानं 32 आणि कामिंडू मेंडिसनंं 26 धावा केल्या. 15 षटकांत 130 धावांत 2 विकेट होत्या, तेव्हा श्रीलंकेचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत होता. मात्र, स्टार वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्यानं एकाच षटकात कामिंदू आणि परेरा यांना केलं. यानंतर पुढच्याच षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईनं दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांना शून्यावर बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर आणलं. श्रीलंकेची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. बिश्नोईने 3 विकेट घेतल्या. तर पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
सूर्या-पांड्या चमकला :भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालनं 15 चेंडूत 30 धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 12 चेंडूत 26 आणि हार्दिक पांड्यानं 9 चेंडूत 22 धावा केल्या. या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या संजू सॅमसनला आपलं खातंही खोलता आलं नाही. श्रीलंकेकडून महिश तिक्शिना, मथिशा पाथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.