महाराष्ट्र

maharashtra

वनडे विश्वचषकाच्या आयोजनानं भारताला मोठा फायदा, कमावले 116370000000 रुपये - World Cup Impact on Indian Economy

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 11, 2024, 5:46 PM IST

World Cup Impact on Indian Economy : भारतात गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला होता, जो 10 शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात चमकदार कामगिरी करुनही भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा विश्वचषक प्रत्येक प्रकारे यशस्वी ठरला आहे.

World Cup Impact on Indian Economy
भारताला मोठा फायदा (ETV Bharat File Photo)

मुंबई World Cup Impact on Indian Economy : गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचं विजेतेपद हुकलं होतं. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघानं संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती पण अंतिम फेरीतील पराभवानं सर्वांचंच मन मोडलं. यामुळं भारतीय संघाची तिजोरी रिकामी झाली असेल पण या विश्वचषकाच्या माध्यमातून देशाला हजारो कोटींचा नफा झाला आहे. ICC नं वर्ल्ड कपच्या 10 महिन्यांनंतर एक अहवाल जारी केला आहे आणि म्हटलं की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेनं भारतीय अर्थव्यवस्थेला 11 हजार कोटींहून अधिक रक्कम दिली, ज्यात पर्यटनापासून ते स्टेडियम अपग्रेड आणि खाण्यापिण्यापर्यंतच्या क्रियाकलापांचा समावेश आहे.

45 दिवसांच्या स्पर्धेत 11637 कोटी रुपयांचा परिणाम : ICC नं बुधवार, 11 सप्टेंबर रोजी विश्वचषक 2023 चा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला. सुमारे 45 दिवस चाललेल्या या टूर्नामेंटचा भारतीय अर्थव्यवस्थेवर 1.39 अब्ज डॉलर्स म्हणजेच 11 हजार 637 कोटी रुपयांचा थेट आर्थिक परिणाम झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. हा फायदा प्रामुख्यानं विश्वचषकाच्या 10 यजमान शहरांना मिळाला आहे. जिथं केवळ स्टेडियममध्ये केलेल्या सुधारणांमुळे बांधकाम संबंधित क्रियाकलापांमध्ये ICC आणि BCCI द्वारे मोठी गुंतवणूक झाली नाही तर या शहरांमध्ये पर्यटकांची रहदारी देखील वाढली.

पर्यटनातून सर्वाधिक कमाई : विश्वचषकादरम्यान, मोठ्या संख्येनं परदेशी आणि देशातील पर्यटकांनी यजमान शहरांना भेट दिली. जिथं त्यांनी केवळ सामनेच पाहिले नाहीत, तर इतर क्रियाकलापांमध्येही भाग घेतला. पर्यटकांचं येणं, मुक्काम, प्रवास आणि खाणं यातून सुमारे 7222 कोटी रुपयांची कमाई झाली. या अहवालात एकूण 12.5 लाख लोकांनी हा विश्वचषक पाहिला, जो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. यापैकी 75 टक्के चाहते पहिल्यांदाच विश्वचषक पाहण्यासाठी आले होते. इतकंच नाही तर 19 टक्के परदेशी पाहुण्यांनी पहिल्यांदाच भारताला भेट दिली. याशिवाय विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामुळं या कालावधीत विविध क्षेत्रात एकूण 48 हजार कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या नोकऱ्याही निर्माण झाल्या.

उत्कृष्ट कामगिरी करुनही भारतीय संघाचा पराभव : जोपर्यंत विश्वचषकाचा संबंध आहे, त्याची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद इथं इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं झाली, जी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्येच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाच्या अंतिम फेरीत संपली. ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव करत विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती आणि स्पर्धेत फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला होता, जो दुर्दैवानं अंतिम फेरीत झाला.

हेही वाचा :

  1. ICC च्या क्रमवारीत मोठी उलथापालथ; भारतीय खेळाडूंना न खेळताच मोठा फायदा - ICC Rankings
  2. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना भारतात कुठं बघता येईल लाईव्ह, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर - ENG vs AUS 1st t20i live in india

ABOUT THE AUTHOR

...view details