महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नाना पटोले आणि संजय राऊत पुन्हा एकत्र; बोगस मतदार याद्यांवरुन निवडणूक आयोगासह भाजपावर गंभीर आरोप

नाना पटोले आणि संजय राऊत पुन्हा एकत्र; बोगस मतदार याद्यांवरुन निवडणूक आयोगासह भाजपावर गंभीर आरोप

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 4 hours ago

MAHVIKAS AGHADI ALLEGATION ON BJP
नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत (Source - ETV Bharat)

मुंबई : जागावाटपावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वाद शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. यानंतर पुन्हा शनिवारी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होती. या बैठकीला सर्व नेत्यांनी हजेरी लावली. बैठक झाल्यानंतर सर्व नेत्यांनी एकत्र येत महायुतीवर जोरदार टीका केली. तसंच जागावाटपावरुन आमच्यात कोणताही वाद नसल्याचं या नेत्यांनी दाखवून दिलं.

बोगस मतं आणली : "महायुतीला आम्ही 'लफंगे' म्हणतो आणि त्यांनाच घटनेनं विशेष अधिकार दिले आहेत. या लोकांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. निवडणूक आयोगानं ॲप बनवून लोकांची मतं कमी करून बोगस मतं जोडण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रात सुमारे 10 हजार बोगस मतं जोडली जात आहेत. आता महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे," असं म्हणत खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला.

निवडणूक आयोगासह भाजपावर गंभीर आरोप (Source - ANI)

महायुतीला पराभवाची भीती : "संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणं महायुतीचे सरकार निवडणूक हरण्याच्या भीतीनं मूळ लोकांची नावं निवडणुकीतून काढून टाकत आहे आणि बोगस मतदारांचा समावेश करत आहे. आम्ही निवडणूक आगोगाला पत्र लिहिलं आहे. निवडणुकीत पारदर्शकता आम्हांला दिसत नाही. निवडणूक आयोग मोदींच्या पायाखाली बसलेला दिसतोय," असं म्हणत नाना पटोलेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.

महायुतीला पराभूत करण्यासाठी एकत्र : "महाविकास आघाडीनं शनिवारी राज्यातील सर्व 288 जागांवर चर्चा केली. ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहे, NCP-SCP देखील चर्चा करत आहे. मला वाटतं, महाविकास आघाडीचा 'धर्म' टिकवून ठेवता येईल. आम्हाला शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा पराभव करायचा आहे, या भावनेला सर्वजण सहकार्य करतील," अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बैठकीनंतर दिली.

भाजपावर गंभीर आरोप : "भाजपानं सर्वेक्षण करून मतदार नसलेल्यांना चिन्हांकित करण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक विशेष अर्ज आणला आणि नावं पूर्णपणे हटवली आणि नवीन नावं आणली. त्यामुळं हा गंभीर मुद्दा आहे," असं म्हणत राष्ट्रवादी-एससीपीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर गंभीर आरोप केलेत.

हेही वाचा

  1. कोल्हापूर जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम, वारसदारांसाठी नेते आग्रही
  2. "कार्यकर्त्यांवर दहशत केली तर गाडून टाकू..." सुजय विखेंचा बाळासाहेब थोरात यांना इशारा
  3. राणा दाम्पत्याला भाजपा नेत्यांचा विरोध; नवनीत राणांसारखं रवी राणांना घरी बसवून राबवणार 'पती पत्नी एकत्रीकरण योजना'
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details