महाराष्ट्र

maharashtra

राम मंदिरावर कॉंग्रेस नव्हे तर जनताच एनडीए आणि यांच्या सरकारवर बुलडोझर चालवणार - रमेश चेन्नीथला - Ramesh Chennithla Exclusive

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 7:14 PM IST

Ramesh Chennithla : आतापर्यंत महाराष्ट्रातील चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळं शेवटच्या चौथ्या टप्प्यातही जनता महाविकास आघाडीला निश्चितच साथ देईल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केलाय.

राम मंदिरावर कॉंग्रेस नव्हे तर जनताच एनडीए आणि यांच्या सरकारवर बुलडोझर चालवणार - रमेश चेन्नीथला
राम मंदिरावर कॉंग्रेस नव्हे तर जनताच एनडीए आणि यांच्या सरकारवर बुलडोझर चालवणार - रमेश चेन्नीथला (ETV Bharat Reporter)

रमेश चेन्नीथला (ETV Bharat Reporter)

मुंबई Ramesh Chennithla : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. केंद्र सरकारची धोरणं याला कारणीभूत असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलीय. या सर्वांचा रोष केंद्र आणि राज्य सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केलाय. लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थांबला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील चारही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळं शेवटच्या चौथ्या टप्प्यातही जनता महाविकास आघाडीला निश्चितच साथ देईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलाय.

शेतकरी आणि बेरोजगारांचा रोष : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, ही परिस्थिती संपूर्ण देशात आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, याला केंद्र सरकारची नीती कारणीभूत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढत आहेत. हे केंद्र सरकारचं अपयश आहे. राज्यातही त्यांनी गद्दार लोकांना आणून बसवलंय. त्यामुळं घटनाबाह्य सरकारसुद्धा काहीही करत नाही, असंही चेन्नीथला म्हणाले. राज्यातील वाढती महागाई आणि बेरोजगारांची संख्या ही अत्यंत वाढल्यानं लोकांचा मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रोष आहे, ही जनता आता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीला अधिक जागा : राज्यात महाविकास आघाडीला आता जास्तीत जास्त जागा मिळतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून आता ते काहीही वक्तव्य करु लागले आहेत. परंतु, जनता त्यांना भुलणार नाही असंही चेन्नीथला म्हणाले.

राम मंदिर पाकिस्तान मुद्दा : गेल्या दहा वर्षांमधील कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपा काहीही बोलत नाही. गेल्या दहा वर्षात त्यांनी जनतेच्या विकासाची कोणतीच कामं केली नाहीत, त्यामुळं ते बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती असल्यानं पुन्हा एकदा राम मंदिराचा आणि पाकिस्तानचा मुद्दा त्यांनी प्रचारात आणलाय. मात्र पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्याकडं केक खायला आणि बिर्याणी खायला आम्ही गेलो नव्हतो, ते गेले होते. ते सुद्धा त्यांना आमंत्रण नसताना गेले होते. राम मंदिर मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, राम मंदिरावर बुलडोझर काँग्रेस किंवा इंडिया आघाडी चालवणार नाही. उलट आता जनताच एनडीए आणि यांच्या सरकारवर बुलडोझर चालवणार हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान पदाचा चेहरा निवडणुकीनंतर : इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, असं ते म्हणतात की आम्ही दरवर्षाला एक पंतप्रधान बदलू. मात्र, आमचे मनमोहन सिंग हे सलग दहा वर्षे पंतप्रधान होते हे भाजपा आणि मोदी विसरले आहेत. सत्तेत आल्यानंतर आमचा पाच वर्ष एकच पंतप्रधान असेल आणि तो कोण असेल हे आम्ही 4 जून नंतर निश्चित करू त्याबाबत आमचे सर्व वरिष्ठ एकत्र बसून बैठक करतील आणि निर्णय घेतील, असंही चेन्नीथला यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलीचं फलित काय? महायुतीला फायदा होणार? राजकीय वर्तुळात विविध चर्चा - lok sabha election
  2. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात उबाठा गटाचा राडा; नेमकं काय घडलं? - Mihir Kotecha

ABOUT THE AUTHOR

...view details