महाबलीपुरम - तमिळ सुपरस्टार आणि आता सक्रिय राजकारणात सहभागी झालेल्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी राज्य आणि केंद्र सरकराच्या विरोधात 'गेट आऊट' ही सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
टीव्हीकेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना विजय यांनी जाहीर केलं की ही मोहीम द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या (बीजेपी) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांसाठी लोकांचा थेट प्रतिसाद आहे.
'गेट आऊट बीजेपी अँड डीएमके' हा हॅशटॅग वापरुन सुरू झालेल्या या मोहीमेत दोन्ही सरकारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. तामिळनाडू राज्यातील जनतेच्या चिंता दूर करण्यात या सरकारांना अपयश आल्याचं यात म्हटलं आहे.
"आम्ही तामिळनाडूच्या राजकारणात उदयास आलेली एक प्राथमिक राजकीय शक्ती आहोत आणि आमच्या राज्यातील १९६७ आणि १९७७ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवण्यावर दृढ विश्वास बाळगून आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमच्या पक्षाच्या वैचारिक तत्त्वांशी तडजोड न करता, मी तामिळनाडू आणि त्यापलीकडं धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आदर्शांचं समर्थन करण्यासाठी तुमच्याबरोबर सहकार्य करण्यासाठी आणि काम करण्यासाठी या ठिकाणी ठाम आहे," असं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना विजय म्हणाले.
जनतेसमोर असलेल्या खऱ्या समस्यांकडे दोन्ही पक्षांची सरकारं दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी विजय यांनी केला. सामान्य माणसाच्या संघर्षांपासून लक्ष विचलित करण्यासाठी एक समन्वित रणनीती दोघांनीही वापरली आहे. भाजपा आणि द्रमुक यांच्यात युती असल्याचं सांगताना विजय म्हणाले, "एक गातो तर दुसरा त्याच्यावर नाचतो, ही अवस्था राखण्यात त्याचं संगनमत आहे. यामुळे सामान्य लोकांच्या चिंता ऐकल्या जात नाहीत आणि दुर्लक्षित राहतात."
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि वादग्रस्त त्रिभाषिक धोरण हे या सह्यांच्या मोहीमेत अधोरेखित झालेल्या मध्यवर्ती तक्रारींपैकी एक आहे. या दोन्ही धोरणांवर विजय यांनी टीका केली आणि दावा केला की हे धोरण तामिळनाडूच्या अद्वितीय सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीला कमजोर बनवत आहे. "लोकांच्या गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि त्रिभाषिक धोरण लादल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना हाकलून लावण्याचा संकल्प करूया," असं विजयनं जाहीर केलं आणि जनतेला दोन्ही सरकारांना जबाबदार धरण्याचं आवाहन केलं. तामिळनाडून सुरू झालेल्या गेट आऊट मोहिमेच्या दस्तऐवजात दोन्ही सरकारांवर भीती, हिंसाचार आणि धमकी देऊन मतभेद दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला कल्याणाचे संरक्षण करण्यात, सामाजिक अन्याय दूर करण्यात आणि व्होट बॅकच्या राजकारणावर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याची टीका केली आहे.
टीव्हीके अध्यक्ष विजय यांनी तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारवरही निशाणा साधला आणि असा आरोप केला की ते अर्थपूर्ण कृतींपेक्षा प्रसिद्धी स्टंटला अधिक प्राधान्य देते. याशिवाय, या मोहिमेत राजकीय हेतूंसाठी सामान्य नागरिकांवरील वाढती हिंसाचार, कामगारांचे शोषण आणि काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास यावर चिंता व्यक्त करण्यात आली.
विजय यांनी तामिळनाडूच्या लोकांना या चळवळीत सामील होण्याचं आवाहन केलं आहे. "लोकांच्या दुःखाकडे डोळेझाक करणे आपल्याला परवडणारे नाही," असं त्यानं आपल्या भाषणात ठामपणे सांगितले. विजय याच्याबरोबर टीव्हीकेचे सरचिटणीस एन आनंद आणि आधव अर्जुन यांनी या गेट आऊट मोहीमेसाठी सही केली.
हेही वाचा -