महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस संसदीय पक्षाची आज दिल्लीत बैठक, सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याकरिता काय आखण्यात येणार रणनीती? - Congress Parliamentary meeting

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 9:11 AM IST

Congress Parliamentary Party General Body Meeting : काँग्रेस संसदीय पक्षाची बुधवारी (31 जुलै) दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतील बडे नेते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पक्ष रणनीती तयार करणार असल्याचंही सांगितलं जातंय.

congress to hold parliamentary party general body meeting on july 31
काँग्रेस संसदीय पक्ष बैठक (ANI)

नवी दिल्ली Congress Parliamentary Party General Body Meeting :काँग्रेस संसदीय पक्षाची सर्वसाधारण बैठक 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी असतील. दरम्यान, सोमवारी (29 जुलै) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाभारतातील घटनांचा संदर्भ देत केंद्रीय अर्थसंकल्पावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता कॉंग्रसची बैठक होत असल्यानं या बैठकीत मोदी सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी? : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "मोदी सरकारनं भारताला अभिमन्यूसारख्या चक्रव्यूहात अडकवल्याचा आरोप करत इंडिया आघाडी हे चक्रव्यूह तोडेल," असं ते म्हणाले. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी असा दावाही केला की, "या अर्थसंकल्पानं काही भांडवलदारांची मक्तेदारी आणि लोकशाही संरचनेला उद्ध्वस्त करणारी राजकीय मक्तेदारी बळकट केलीय. तर तरुण, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय. जर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर जातनिहाय जनगणना करण्यात येईल. तसंच शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी देखील दिली जाईल," असं आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी केलं.

भारताला चक्रव्युहात अडकवण्यामागं 'या' शक्तींचा हात : पुढं अर्थसंकल्पाचा हवाला देत राहुल गांधी यांनी दावा केला की, "भारत आज ज्या चक्रव्यूहात अडकलाय त्यामागं तीन शक्ती आहेत. पहिली म्हणजे एकाधिकारशाही. दुसरी शक्ती या देशातील सीबीआय, ईडी, आयकर विभागासारख्या संस्था आणि तिसरी म्हणजे राजकीय शक्ती आहे. या तिन्ही शक्ती चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी आहेत."

हेही वाचा -

  1. राहुल गांधी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलणार? काँग्रेसच्या खासदारांकडून होतोय आग्रह - Rahul Gandhi On Union Budget 2024
  2. संसदेचं पावसाळी अधिवेशन 2024 : अर्थसंकल्पावरुन आजही विरोधक आक्रमक ; जम्मू काश्मीर प्रश्नावरुन रणकंदन - Parliament Monsoon Session 2024

ABOUT THE AUTHOR

...view details