महाराष्ट्र

maharashtra

"नव्या कायद्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद", महिलांवरील अत्याचारावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला संताप - PM Modi On Women Crime

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 8:43 PM IST

PM Narendra Modi On Lakhpati Didi Yojna : गेल्या काही दिवसांपासून देशात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बदलापूर येथे दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला अत्याचारावर आज जळगाव इथं भाष्य केलं आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source - ETV Bharat)

जळगाव PM Modi On Women Crime : जळगावमध्ये ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला अत्याचारावर पहिल्यांदाच भाष्य केलं. "महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

महिलांचं संरक्षण केलं पाहिजे :पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले, "महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. अशा प्रकरणांमध्ये जो कोणी दोषी असेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे. दोषीला मदत करणारे देखील शिक्षेपासून वाचवता कामा नये. रुग्णालय असो, शाळा असो, कार्यालय असो किंवा पोलीस यंत्रणा, कोणत्याही स्तरावर कारवाई करताना बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या, गांभीर्य न बाळगता कारवाईकडं दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. सरकारं येतील जातील, पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं रक्षण व्हायला हवं. महिलांचं चारित्र्य जपलं पाहिजे. एक समाज म्हणून, सरकार म्हणून आपण महिलांचं संरक्षण केलं पाहिजे. ते आपलं मोठं कर्तव्य आहे."

अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार :"महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कडक कायदा करत आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही, सुनावणी होत नाही. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केल्या आहेत. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल, तर त्या घरुनच ई एफआयआर करू शकतात. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही, याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल. नवीन कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

'लखपती दिदी'मुळे कुटुंबाचा कायापालट :"या मैदानातील प्रत्येक बहीण, मुलीला चांगलं माहीत आहे की, जेव्हा त्या कमावतात, तेव्हा त्यांचा अधिकार वाढतो. घरात त्यांचा सन्मान वाढतो. जेव्हा महिलांची कमाई वाढते, तेव्हा घरातील लोकांना खर्चासाठी पैसा मिळतो. लखपती दिदी मुळे कुटुंबाचा कायापालट होत आहे”, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. "आज तिन्ही सैन्य दलात महिला अधिकारी आहेत. फायटर, पायलट महिला बनत आहेत. नारिशक्ती नवा कायदा बनवला. राजकारणात महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले. लखपती दीदींमुळे गावांची अर्थव्यवस्था बदलणार आहे," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details