महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मणिपूरमधील हिंसाचारानंतर एनपीपीनं सरकारचा काढला पाठिंबा, सत्तापालट होणार का? - MANIPUR VIOLENCE

मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यात अपयश ठरल्यानंतर सरकारमध्ये मतभेद निर्माण झालेत. नॅशनल पीपल्स पक्षानं (एनपीपी) भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचा पाठिंबा काढून दिला आहे.

Manipur Violence NPP Withdraws Support
एनपीपीनं मणिपूर सरकारचा काढला पाठिंबा (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2024, 8:13 AM IST

गुवाहाटी/इंफाळ- गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं मणिपूरमधील जनतेला भीतीदायक वातावरणात राहावं लागत आहे. त्यामुळे जनतेमधील वाढता असंतोष पाहून एनपीपीनं भाजपाला दिलेला पाठिंबा काढून घेतला.

एनपीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी रविवारी पत्र जारी करून मणिपूर सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती दिली. त्यांनी पत्रात म्हटले, "मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर राज्य सरकार संकट दूर करण्याकरिता तसेच राज्यात पूर्वीप्रमाणं सामान्य स्थिती करण्यासाठी सपशेल अपयशी ठरलंय. अशी सध्याची परिस्थिती पाहता एनपीपीनं बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा तात्काळ काढून घेतला आहे."

मणिपूरमध्ये सत्तापालट होणार का?मणिपूर विधानसभेत एकूण 60 आमदार आहेत. त्यात एनपीपीचे केवळ सात आमदार आहेत. त्यामुळे एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्यानं मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळणार नाही. मणिपूर विधानसभेत भाजपाचे 37 आमदार आहेत. मात्र, मणिपूरमध्ये होत असलेले हिंसाचार आणि एनपीपीनं सरकारचा काढून घेतलेला पाठिंबा यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

एन बीरेन सिंह यांना हटविण्याची मागणी-मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्याबाबत सरकारमध्येच नाराजी आहे. मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष सत्यव्रत सिंग यांच्यासह 19 आमदारांच्या शिष्टमंडळानं गेल्या महिन्यात (ऑक्टोबर 2024 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मणिपूरमधील चिंताजनक परिस्थिती बदलण्यासाठी नेतृत्व बदलाची म्हणजे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना हटविण्याची शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदींकडे मागणी केली. मात्र, भाजपाकडून बीरेन सिंह यांनाच मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडं जनतेत लोकप्रतिनिधींबद्दल रोष वाढत आहे. कुकी दहशतवाद्यांविरोधात कारवाई होत नसल्यानं भाजपा आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी स्थानिक नागरिकांमधून मागणी होत आहे.

आम्हाला न्याय हवा -मणिपूरच्या खोऱ्यातील अनेक संघटना भाजपा सरकारचे मुख्यमंत्री, आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले, "मणिपूरमध्ये कोणाचीही सत्ता असो, आम्हाला न्याय हवा आहे. मणिपूरचे लोक त्रास सहन करत आहेत. पंतप्रधान काय करत आहेत? ते जगभर फिरत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये फिरत आहेत. पण ते मणिपूरला जात नाहीत. तिथे जाण्याकरिता त्यांना तोंड नाही. केंद्र सरकारच्या या वागण्याचा निषेध करतो. राहुल गांधी हे मणिपूरला गेले होते."

भाजपा राजकारणात गुंग-काँग्रेस नेते कुंवर दानिश अली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, "भाजपाचे (सत्तेचे) दिवस आता संपणार आहेत. ईशान्येकडील राज्यातून पाठिंबा काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेडीयू किंवा टीडीपीनं भाजपाचा पाठिंबा काढून घेतल्याचंही तुमच्या कानावर येईल. मोदी सरकार पडेल. अनेक आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर एकही मागणी पूर्ण केलेली नाही. त्यांना या सगळ्याशी काही देणेघेणे नाही. सर्वांसमोर मणिपूरची परिस्थिती दिसत आहे. ते फक्त फूट पाडा आणि जिंका या राजकारणात गुंग आहेत.

  • मणिपूरमध्ये काय आहे स्थिती?कुकी दहशतवाद्यांनी अलीकडेच आठ महिन्यांच्या बाळासह सहा जणांची हत्या केली. दुसरीकडं सीआरपीएफ दलांच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दहा सशस्त्र गुंड ठार झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details