Published : Jun 22, 2024, 7:54 AM IST
पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; फेसयुक्त पाण्यानं अवघं नदीपात्र झाकलं, वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात - Indrayani River Polluted
आळंदी Indrayani River Pollution : कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात अडकलीय. महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या देवाच्या आळंदीतील आणि देहूतील इंद्रायणी नदी वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानली जाते. त्यामुळं लाखो भाविक आळंदी आणि देहूला दर्शनासाठी येत असतात. संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येतात. या वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थासमान आहे. अनेक वारकरी या नदीत स्नान करतात, शिवाय तीर्थ म्हणून नदीचं पाणी देखील पितात. मात्र, इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. नदी काठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडलं जाते. त्यामुळं वारंवार ही नदी प्रदूषित होते. त्यातच आळंदीचा पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर आल्यानं, आता यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.