छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड मतदार संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर आजही ठाम असल्याचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मतदार संघात रस्त्यांची नावं बघा, एकतरी जुन्या नेत्यांची नावं आहेत का बघा. त्या मतदार संघात सरकारी जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे. त्याठिकाणी इमारत उभारायची आणि विकायची, पैसे कमावण्याचे धंदे सुरू असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय. मी राज्यसभेवर आणि विधानसभेवर जाणार नाही. मला पक्षानं खूप काही दिलेलं आहे. माझे दोन मुलं आमदार आहेत. जर पक्षानं संधी दिली तर मी 2029 ची लोकसभेची निवडणूक लढेल, अशी माहिती त्यांनी दिली. तर लव्ह जिहाद कायदा महत्वाचा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अब्दुल सत्तार यांच्यावर टीका : "अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात नाही. मात्र त्यांची जी वागण्याची पद्धत आहे. त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लोक नाराज आहेत. एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिल्या जात आहेत. इतर लोकांना फायदा न मिळू देणं ही त्यांची विचारधारा आहे. मी देखील त्यांचा विरोध करतो. सगळेच अब्दुल सत्तार यांच्या विचारधारेच्या विरोधात आहेत. सिल्लोडच्या प्रत्येक चौकाचं नाव काय आहे, ते पहा ना. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, शामाप्रसाद मुखर्जी यांची नावं नाहीत, नावावरून तर त्या गावाची रचना कळते ना. यांची विचारधारा कशी आहे कळते, खायचं इकडचं, गायचं दुसऱ्यांचं. आजही म्हणतो मी की सिल्लोडमध्ये 'तशीच' परिस्थिती आहे," अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांना दुःख : संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे काय संजय राऊतच्या खुटाशी बांधील आहेत का? राजकीय पक्षांनी एकत्र बसून नये का? आम्ही एकत्र बसतो हे संजय राऊत यांचं दुःख आहे. आमचा पक्ष म्हणजे परिवार आणि यांचा पक्ष परिवाराचा पक्ष आहे, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. राज्यातील गावागावात यांच्यामुळे भांडण झालं आणि हे वरच्यावर एकत्र येत असतील, तर मतदार कसे यांच्यासोबत राहतील. मुंबईची महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बाप लेक दोघंच राहतील आणि त्याचं कारण संजय राऊत हे असतील, अशी टीका देखील रावसाहेब दानवे यांनी केली. 72 वेळेस काँग्रेसनं घटना बदललेली आहे, हे घटनेबद्दल बोलत आहेत, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
गेलेले उमेदवार पुन्हा भाजपात : सिल्लोड मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांनी घरवपासी केली आहे. अनेक जण जे निवडणुकीच्या काळात पक्षातून गेले ते आता मूळ विचार धारेत परत येत आहेत. त्यामुळे बनकर, एकनाथ जाधव यांच्यासह पक्षात परत आले आहेत. लोकसभा, विधानसभा झाल्या, त्यानंतर आता अनेक जण सत्तेच्या बाजूनं येत आहेत, असं देखील दानवे यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- "ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज
- रावसाहेब दानवेंनी लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्ता म्हणाला, "३० वर्षांपासून..."
- एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale