पुणे : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections 2025) तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. मात्र, यावरुन विरोधांकडून जोरदार टीका केली जात आहे. या टीकेलाच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नाहीतर त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनाही खुलं आव्हान दिलंय.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? : पुण्यातील सर परशुराम महाविद्यालय येथे आयोजित हिंदू गर्जना कुस्ती स्पर्धेचं चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. सुरुवातीला दिल्ली निकालावर बोलतांना ते म्हणाले की, "दिल्लीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळालाय. भाजपाचे 48 उमेदवार निवडून आलेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीतील जनतेनं विश्वास ठेवलाय. अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला जनतेनं नाकारलंय. गेल्या 27 वर्षात दिल्लीचा जो विकास झाला नाही, तो विकास करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे."
राहुल गांधींना ओपन चॅलेंज : राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. यासंदर्भात विचारण्यात आलं असता बावनकुळे म्हणाले, "राहुल गांधी यांना अजूनही राज्याचा निकाल पचवता येत नाहीये. त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असतं आणि संघटनेत बदल केले असते, तर त्यांनाही चांगले दिवस आले असते. आज राज्यात काँग्रेसचं अध्यक्ष व्हायला कोणीही तयार नाही. ते माझ्या मतदारसंघाविषयी देखील बोलले. पण माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की, त्यांनी 2029 मध्ये माझ्या मतदार संघातून लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही."
2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार होणार : पुढं ते म्हणाले, "लोकसभेच्या अगोदर मुंबईत 32 पक्ष एकत्रित आले. त्यांनी हातात हात मिळवून पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात रणशिंग फुंकले. काँग्रेस पक्ष त्यांच्या नीतिमत्तेमुळं हरलाय. देशाची जनता राहुल गांधी यांना बाजूला करत आहे. 2047 पर्यंत या देशातून काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही", असंही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा -
- महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- राहुल गांधींनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला, राज्यातील मतदानातील अनियमिततेचे आरोप फेटाळले
- राहुल गांधींच्या विधानानं राजकारण तापलं; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, शिर्डीत नेमकं काय घडलं?