यवतमाळ - कोरोना विषाणूने (कोव्हीड-2019) ने सध्या संपूर्ण जगात संकट उभे केलेआहे. यापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय स्तरावर 'कॉरेंटाईन वॉर्ड' (विलगीकरण कक्ष) तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात ‘104’ हा टोल फ्री क्रमांक चोवीस तास कार्यरत करण्यात आला आहे.
सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांना शंका-कुशंकाचे निराकरण करता येणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस... पिकांचे मोठे नुकसान
कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून या रोगाची लक्षणे आढळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे त्वरीत उपचारासाठी दाखल व्हावे. आजपर्यंत कोरोनाचा एकही संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीसुध्दा भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. मात्र, याबाबत दक्ष राहून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी 'जय हिंद'चा उल्लेख