वाशिम - जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील शिरपूर, एरंडा, भोयता, बोराळा या भागातील नदी नाल्यांना पूर आला आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या खरीप हंगामात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथल्या नाल्याला पूर आल्याने वाघी, खंडाळा, गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच शिरपूर-करंजी रस्त्यावरील शिरपूर नजीकच्या नाल्याला पूर आल्याने शिवारातील शेतकरी दोन्ही बाजूला अडकून पडलेत. एरंडा, भोयता, बोराळा येथे मुसळधार झालेल्या पावसामुळं नदी, नाले भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पाणी शेतामध्ये उभे राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे काही जणांचे पेरलेले बियाणे वाहून गेल्याचेही चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पुराच्या पाण्यात अडकेलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी दोराच्या सहाय्याने प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले.
रिसोड तालुक्यातील रिठड व असेगाव परिसरात जोरदार पावसामुळे आडोळ नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. या नदीचे पाणी शेतात घुसल्याने सोयाबीन, तूर, कापूस, मुग, उडीद, हळद या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शनिवारी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. लॉकडाऊनमुळे आधिच संकटात सापडलेला शेतकरी पीक वाया गेल्यास आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.