वाशिम - दरवर्षी उन्हाळ्यात लग्नसराई आणि यात्रा महोत्सवात फुलाला मोठी मागणी असते. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे फुलशेतीला बाजारपेठ मिळत नसल्याने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर झाड उपटून फेकण्याची वेळ आली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात लग्नसराई आणि यात्रा महोत्सवात फुलाला मोठी मागणी असते. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने फुलशेतीला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाशिम येथील शेतकरी महादू वानखेडे हे दरवर्षी फुलशेती करतात. यंदाही फुलशेती चांगली बहरली होती. ऐन फुले विक्रीला आले असताना कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले. त्यामुळे सर्व कार्यक्रम, लग्नसमारंभ, यात्रा महोत्सव बंद झाले. आता फुलशेतीला बाजारपेठच नसल्यामुळे फुल झाडं शेतातून उपटून फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे, शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहेत. यंदा तरी फुलशेतीमधून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अशा होती. मात्र, कोरोना विषाणूमुळे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.