वर्धा - महात्मा गांधींच्या विचाराधारेवर आधारित सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद पेटून आहे. यात सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदासठी होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या 200 लोकांच्या परवानगीवर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 50 लोकांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे. 28 आणि 29 नोव्हेंबर, असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे.
महात्मा गांधीजींच्या विचारांना अनुसरून सर्वोदय सेवा मंडळाची म्हणजेच, सर्वसेवा संघाची स्थापना आचार्य विनोबा भावे यांनी केली होती. गांधींच्या विचाराचा प्रभाव असणारी शिखर संस्था म्हणजे सर्व सेवासंघ आहे. मागील काही काळापासून अध्यक्षपदाच्या वादामुळे गांधीवाद्यांसह संस्थेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडित अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले आहे.
फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली 200 लोकांची परवानगी रद्द झाली होती. यामुळे आता फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे अधिवेशन 28 आणि 29 नोव्हेंबर, असे दोन दिवस चालणार असून, 29 तारखेला अधिवेशनात सर्वसेवा संघाच्या अध्यक्षाची निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्ष निवडीचा वादाला कशी झाली सुरवात?
सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. पण, कोरोनामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून मागील दोन सत्रापासून असणारे महादेव विद्रोही हेच राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. पण, त्यांच्यावर काही लोकांच्या आक्षेपानंतर ऑनलाइन बैठक घेत त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागेवर ऑनलाइन बैठकीतून चंदनपाल यांची नियुक्ती झाली. यानंतर महादेव विद्रोही यांचा एक गट आणि त्यांना विरोध करणारा दुसरा गट, असे दोन गट झाले. यात ही नियुक्ती चुकीचे असल्याचे म्हणत, प्रकरण हे चॅरिटी कमिशनर यांच्याकडे गेले.
अधिवेशनापूर्वी अध्यक्षाची निवड....
अधिवेशनात अध्यक्षाची निवड होणार म्हणून निवडणूक प्रक्रियेला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरवात झाली. यात काही दिवसांपूर्वी महादेव विद्रोही यांच्या गटाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात अरविंद रेड्डी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. या निवडणुकीत वाराणसीच्या प्रदीप कुमार बजाज यांची सर्वसेवा संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
२०० नागरिकांच्या उपस्थितीला आक्षेप
अधिवेशनासाठी दोनशे लोक हजर राहाणार होते. यात वर्ध्याचे सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र शर्मा यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 200 लोक हे देशभरातून वर्ध्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो या आधारावर 200 लोकांना परवानगी देऊ नये, असे म्हणणे नागपूर खंडपीठाकडे मांडले होते. यात न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीवर हस्तक्षेप केल्यानंतर 50 लोकांच्या उपस्थिती हा कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट झाले.
या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर काही नवीन वादाला होणारी सुरुवात पाहाता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, यावर धर्मदाय आयुक्तांच्या प्रकरणात काय होणार, हे ही महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - हे अपयशी, विदर्भावर अन्याय करणारे सरकार - खासदार रामदास तडस