ठाणे (मिरा भाईंदर)- मिरारोड पोलिसांनी दोन किलो चरस सह तीन आरोपी गजाआड केले आहेत. मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवार गार्डन परिसरात बुधवारी रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली. शहरात गस्त घालत असताना वाहतूक शाखेच्या टीमला तीन जनावर संशय आला. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे हातातील पिशवीमध्ये चरस हा अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगेच त्यांना आपल्या ताब्यात घेत मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना अटक केली. दरम्यान, त्यांचा एक साथीदार रहेमान हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूड व ड्रग्स कनेक्शन यांचे धागेदोरे बाहेर आले आहेत. आता याचे थेट कनेक्शन मिरा भाईंदर शहरास जोडले गेले आहे. या अगोदर सुद्धा अमली पदार्थ विभाग मुंबई यांनी भाईंदरच्या अलगिकरण कक्षात काम करणाऱ्या अविनाश सिंह याला अटक केली होती. तेव्हा सुद्धा पोलिसांनी २ किलो ४० ग्रॅम चरस जप्त केले होते. त्यानंतर मिरा भाईंदरच्या पोलिसांनी नयानगर, भाईंदर, काशीमिरा व नवघर परिसरात अनेक ठिकाणी धाडी मारून गांजा, चरस व एमडी असे ड्रग्स जप्त करून कारवाई केल्या आहेत.
सदरील २ किलो २० ग्रॅम चरस याची बाजारात किंमत ८ लाख ८ हजार आहे. अटक केलेले आरोपींनी हे चरस विक्रीसाठी आणले होते. आरोपी नदीम अब्दुल रहीम चौघुले (२७), दाऊद मकबूल अन्सारी (२५), अर्षद सलाऊद्दीन खान (२६) यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.