ठाणे - मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या(एसआरए)च्या धर्तीवर ठाण्यातही एसआरए योजना राबवली जाईल. त्यामाध्यमातून तेथील नागरिकांना २६९ चौरस फुटांऐवजी ३०० चौरसफुटांचे घर देण्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानपरिषदेत केली.
ठाणे झोपडपट्टी योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर देण्याची तरतूद असल्यामुळे या पुनर्वसन योजनांना विकासकांकडून आवश्यक तो प्रतिसाद आला नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी कळवले आहे. त्यामुळे ३०० फुटांचा निर्णय घेण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले. ठाण्यात एसआरए योजनेच्या अंतर्गत ३०० चौरस फुटांचे घर देण्याची मागणी भाजपचे निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. त्यात त्यांनी ठाण्यात एसआरए कार्यालय सुरू झाल्यापासून म्हणजेच ८ एप्रिल २०१६ पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे केवळ १० प्रस्तावच आल्याचे निरंजन डावखरे यांनी आपल्या प्रश्नात विचारले होते. मात्र, त्यावर दुरुस्ती करत एसआरएचे १९ प्रस्ताव नव्याने आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
ठाणेकरांसाठी एसआरए योजनेत ३०० फुटांच्या घरांची घोषणा केली. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, महाविकास आघाडीने आपल्या किमान समान कार्यक्रमात ५०० फुटांचे घर देऊ, असे सांगितले होते. त्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी विचारला. त्यावर भाजपने आमच्या किमान समान कार्यक्रमाचा फारच अभ्यास केला असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. तसेच ५०० फुटांचे घर देण्यासाठी सरकारला अभ्यास करावा लागेल, असे आव्हाड म्हणाले.