ठाणे - अनलॉकमुळे सुरु झालेल्या केमिकल कंपन्यांच्या विषारी रसायन मिश्रीत पाण्यामुळे भिवंडीतील कामवारी नदी पात्रातील अनेक मासे मृत झाले आहे. या घटनेमुळे रासायनिक कंपन्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील निबवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठे मोठे गोडाऊन असून काही गोडाऊनमध्ये विविध रासायनिक कंपन्या आहेत. लॉकडाऊनच्या 3 महिने काळात तालुक्यातील गोदामपट्टा बंद होता. आता अनलॉकमुळे येथील रसायन कंपन्या सुरु झाल्या असून या कंपन्यामधून तेलमिश्रित रसायनाचे पाणी कामवारी नदीच्या पात्रात सोडल्याने नदीतील मासे मृत झाले असल्याचा दावा निंबवली गावातील नागरिकांनी केला आहे.
तर, निबवली गावाजवळील वडापे, धमणगाव व इतर गावालगतही मोठ्या प्रमाणात गोडाऊन असून येथेही गोडाऊनमध्ये रासायनिक कंपन्या आहेत. तर काही गोडाऊनमध्ये केमिकलची साठवणूक केली जाते. या कपंनीतील दूषित पाणी थेट कामवारी नदीच्या पात्रात सोडल्याने या नदीतील मासे मारण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे कल्याण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व विषारी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.