पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी 13 ऑगस्टपासून कोरोना निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यात निर्बंध कडक करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील पाच तालुक्यात नियमांची अंमलबजावणी होणार -
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे, मात्र, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी 13 ऑगस्टपासून या तालुक्यांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. त्यातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यात काही गावे हॉटस्पॉट होताना दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या -
सोलापूर जिल्ह्यात 4280 रुग्ण ग्रामीण भागात तर 66 सोलापूर शहरात असे 4346 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात 1433 तर ग्रामीणमध्ये 3158 असे 4591 मृत्यू कोरोनाने झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. पॉझिटिव्हीटी दर 3.6 टक्के झाला आहे. पंढरपूरसह पाच तालुक्यात जिल्ह्यातील निम्मे कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. माळशिरस तालुक्यात मध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्या खालोखाल पंढरपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.