सिंधुदुर्ग - अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली. आहे. जिल्ह्यात 'एनडीआरएफ'ची टीम दाखल झाली असून मालवण आणि तारकर्ली येथे ते तैनात आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी(१ जून) जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. यामध्ये सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किनारी भागातील आपत्ती व्यवस्थापन ग्रुप सतर्क करण्यात आले आहेत. एनडीआरएफची टीम या ग्रुपसोबत संपर्कात असून आपत्ती काळात त्यांची मदत घेतील जाणार आहे.
जिल्ह्यातील तीन प्रमुख बंदरात मच्छिमार बोटी मोठ्या प्रमाणात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना तात्काळ मागे बोलावण्यात आले. तसेच समुद्रात कोणीही जाऊ नये, असे कडक आदेश देण्यात आले आहेत. अन्य खबरदारीसाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
किनारी भागातील तलाठी आणि ग्रामसेवकांना आपत्ती निवारण कक्षासोबत सतत संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात खास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत असून वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.