सांगली - सागंली लोकसभेची जागा काँग्रसेच्या हातून गेल्यानंतर सांगली काँग्रेस कार्यालय जणू बंदच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या कार्यालयाकडे नेते, कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असून कार्यालयाला टाळे पडले आहे. त्यामुळे सांगलीचे काँग्रेस कार्यालय एकाकी पडले आहे.
वसंतदादा घराणे या ठिकाणी लोकसभेच्या मैदानात उतरु शकले नाही. याला काँग्रेस मधील अंतर्गत संघर्षाचे परिणाम हे मुख्य कारण आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काँग्रेसच्या हातात राहिलेली सांगली लोकसभेची जागा महाआघाडीचे मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली आहे. काँग्रेस अंतर्गत वादामुळे हे घडले आहे आणि या सर्वांचा परिणाम सांगली काँग्रेस कार्यालयाच्या आजच्या अवस्थेतवरून स्पष्ट दिसत आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत धामधूम असणाऱ्या काँग्रेस कार्यालयात आता शुकशुकाट आहे. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला गेल्याने नेते, कार्यकर्ते यांनी काँग्रेस कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे.
१९५९ पासून सांगलीच्या काँग्रेस कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीचे राजकारण शिजले. निवडणुकीचे नियोजन आणि विरोधकांनी काटशह देण्यासाठी रणनीतीही याच ठिकाणी ठरली. निवडणूकी पासून निकाला पर्यंत कार्यालयात नेते, कार्यकर्त्यांचा राबता असायचा आणि काँग्रेस उमेदवाराला याच काँग्रेस कार्यालयाचा आसरा घ्यावा लागायचा. मात्र, यंदाच्या निवडणूकीत हे चित्र दिसत नाही. यामुळे अनके लोकसभा निवडणूकीचे साक्षीदार असणारे सांगलीचे काँग्रेस कार्यालया ऐन लोकसभा निवडणूकी मध्ये एकाकी पडलं आहे.