सांगली - कोरोनाचे संकट असताना पुराचे संकट येवू नये, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याकडून माहिती घेवून पावसाचा अंदाज बघा. दोन्हींचा ताळमेळ घालूनच धरणातील पाणी सोडा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती गंभीर होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांदोली धरणाला भेट देऊन पाहणी केली . यावेळी आमदार मानसिंगराव नाईक उपस्थित होते. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक किती आहे, याची जयंत पाटील यांनी माहिती घेतली. सध्या झालेला पाऊस व गतवर्षाच्या पावसाची माहिती घेऊन तुलनात्मक अभ्यास करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली. पावसाळाच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने सतर्क राहावे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी धरणाची पाणी साठवण क्षमता व होणारा पाऊस याची माहिती घेतली.
पुरस्थिती निर्माण होवू नये, म्हणून धरणाची उंची एक फुटाने वाढवली तर किती टीएमसी पाणीसाठा होईल. याचा अंदाज घ्या. तसा आराखडा तयार करा. यावेळी पुरस्थिती निर्माण होणार नाह, याचे नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता आर. डी. मोहिते, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर व शाखाधिकारी टी.एस. धामणकर उपस्थित होते.
दरम्यान, गतवर्षी पुराचा सांगलीला मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज होत आहे.