रत्नागिरी - केंद्र सरकारने 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यावर 45 दिवसांत सूचना मागवल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये मात्र याबाबत चलबिचल आहे. कारण यातील अनेक कीटकनाशके शेतकरी वापरत असतात. आंबा उत्पादक शेतकरीदेखील यापैकी 8 ते 10 कीटकनाशके वापरतात. तसेच सध्या वापरात असलेली कीटकनाशके शेतकऱ्यांच्या आवाक्यातील आहेत. मात्र, ही कीटकनाशके बंद झाली तर शेतकऱ्यांना जास्त किंमतीची कीटकनाशके घ्यावी लागतील, त्यामुळे पर्यायाने त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडेल. मात्र ज्याअर्थी सरकार या कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा विचार करत आहे, त्याअर्थी या कीटकनाशकांचे काही साईड इफेक्ट्स असू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा स्वीकार करायला पाहिजे, असाही एक विचार आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.
सध्या आंबा बागायदार वापरत असलेली कीटकनाशके ही भारतात तयार होणारी आणि स्वस्तात मिळणारी जेनरिक कीटकनाशके आहेत. त्यांच्या किंमतीही इथल्या शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. यातील क्यूनालफॉस हे कीटकनाशक आंब्यावरील किडीसाठी वापरतात. हे कीटकनाशक 400 रुपये लिटर आहे. कार्बेन्डाझिम पावडर ही आंब्यावरील बुरशी रोगासाठी वापरतात, ही 500 रुपये किलो आहे. क्लोरपायरिफॉस हे वाळवी आणि किडीसाठी वापरतात, हे किटकनाशक 400 रुपये लिटर आहे. फेनाक्यूकार्ब हे आंब्यावरील तुटतुडा रोगासाठी वापरतात, हे 550 रुपये लिटर आहे, तर डेल्टामिथ्रीन हे किडीसाठी वापरतात, हे कीटकनाशक 600 रुपये लिटर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकरी ही कीटकनाशके वापरत आहेत. त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून याला मोठी मागणी असते, असे कोकणातील अग्रगण्य असणाऱ्या नंदाई ऍग्रोशॉपीचे मालक तसेच स्वतः एमएससी अग्रीकल्चर असलेले मोहिंदर बामणे सांगतात. तसेच या कीटकनाशकांवर बंदी आली तर शेतकऱ्यांना 2 ते 3 हजार रुपये लिटर असणारी कीटकनाशके विकत घ्यावी लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांना 4 ते 5 पाचपट अधिक भुर्दंड बसेल असेही बामणे सांगतात.
याबाबत आंबा उत्पादक शेतकरी प्रसन्न पेठे यांना विचारले असता, आता वापरात असलेली कीटकनाशके ही शेतकऱ्यांना परवडणारी आणि रिझल्ट देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. पण काही कीटकनाशके आहेत त्यांचे अंश खूप दिवस पाण्यात किंवा जमिनीत राहतात आणि अशी कीटकनाशके जर सरकार बंद करणार असेल तर शेतकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे, असेही मत पेठे यांनी व्यक्त केले आहे. पण सरकारने सरसकट बंदी न घालता जेवढी घातक कीटकनाशके तेवढीच बॅन केली पाहिजेत. ज्यांचा परिणाम माणूस किंवा जमिनीवर फार होत नाही, अशा कीटकनाशकांना या बंदीतून वगळावे अशीही मागणी पेठे यांनी केली आहे.
आंब्यावरील कीटकनाशके खर्च-उत्पादन -
जर चांगली आणि योग्य प्रमाणात आंब्यावर कीटकनाशक फवारणी केली, तर साधारणतः आंबा उत्पादक शेतकऱ्याला 100 झाडांसाठी 2.25 ते 2.50 लाख रुपये खर्च येतो. काही शेतकरी एक ते दीड लाख रुपयांतही ही फवारणी करतात. पण जर व्यवस्थित कीटकनाशक फवारणी झाली तर त्याचा उत्पादन वाढीवरही चांगला परिणाम होतो. उत्पादन वाढतंच, शिवाय फळही दर्जेदार मिळते. पण जर कीटकनाशक फवारणीच केली नाही तर त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो. जिथे 500 पेटी आंबा मिळायचा तिथे फक्त 200 ते 250 पेटी आंबाच मिळतो. म्हणजे जवळपास 50 टक्के उत्पादनावर फरक पडतो, मात्र त्यातही अशा बऱ्याच आंब्यांवर काळे डाग असतात. त्यामुळे त्यांचा दर्जा घसरतो. साहजिकच त्यांचा आर्थिक बाबींवर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगतात.