रायगड - दिवेआगर येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणरायाचा सोन्याचा मुखवटा आणि दागिने चोरट्याने आठ वर्षांपूर्वी चोरल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागून आरोपींना शिक्षाही झाली होती. मात्र जप्त केलेले सोने हे सरकारजमा करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला दिलासा दिला असून त्याच सोन्याचा वापर करून मुखवटा तयार करण्याची परवानगी न्या. रेवती डेरे यांनी दिली आहे. दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिरात त्याच सोन्यापासून तयार झालेला गणरायाचा मुखवटा गणेशभक्तांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुन्हा दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराला गतवैभव प्राप्त होणार आहे.

2012साली चोरला होता मुखवटा
23 मार्च 2012साली दिवेआगर गणेश मंदिर फोडून दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सोन्याचा मुखवटा आणि इतर दागिने चोरट्याने पळविले होते. या घटनेने जिल्ह्यासह राज्यात खळबळ माजली होती. या चोरी प्रकरणात 1 हजार 305 ग्राम गणपतीचा मुखवटा आणि 161 ग्रामचे इतर दागिने असा 1 हजार 466 ग्रामचे सोने चोरट्याने चोरले होते. रायगड पोलिसांनी या चोरीचा तपास करून आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपीना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली.
न्यायालयाने सोने केले होते सरकारजमा
पोलिसांनी चोरट्याकडून 1 हजार 361 ग्राम सोने हस्तगत केले होते. खटला सुरू असताना गणपती ट्रस्टने सोने परत मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र सरकारने देवस्थानला दिलेला मुखवटाच अस्तित्वात न राहिल्याने ट्रस्टचा अर्ज उच्च न्यायालयाने नाकारून सोने सरकारजमा करण्याचे आदेश केले.
उपविभागीय अधिकारी यांनी केला होता परवानगीसाठी अर्ज
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. सरकारतर्फे श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी सोन्यापासून अर्धांग मुखवट्यासारखा मुखवटा बनवून तो मंदिरात ठेवण्यास परवानगी द्या असा अर्ज उच्च न्यायालयात केला होता. त्यानुसार बुधवारी न्या. डेरे यांनी परवानगी दिली आहे. मुखवटा बनविताना सोन्याचा दर्जा, वजन वैगरे बाबीची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुन्हा दिवेआगर गणेश मंदिरात भक्तांची मांदियाळी वाढणार
2012साली दिवेआगर मंदिरातील गणरायाचा सोन्याचा मुकुट आणि इतर दागिने चोरल्याची घटना घडून आठ वर्षे झाली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात गणेश मुखवट्याची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात भक्तांची संख्या ही रोडावली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला होता. मात्र आता न्यायलायने पुन्हा गणरायाचा पूर्वी प्रमाणे त्याच सोन्यापासून बनविलेला अर्धांग मुखवटा मंदिरात स्थापित केला जाणार असल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिवेआगर सुवर्ण मंदिराला गतवैभव प्राप्त होणार आहे.