पिंपरी-चिंचवड (पुणे) - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय काळजी घेतली पाहिजे. प्रतिकार शक्ती कशी वाढवली पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे कोविड आणि पोस्ट कोविडवर उपचार करणारे डॉ. प्रीतम राजेश लांडगे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा संसर्ग कमी होत आहे. दररोज हजारो रुग्ण शहरात बाधित आढळत होते. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले असून तीच संख्या 200 ते 300 पर्यंत आली आहे. पण, संकट अद्याप टळले नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टसिंग, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे.
डॉ. प्रीतम लांडगे म्हणाले की, ताप, अंगदुखी, खोकला, अतिसार, दम लागणे ही लक्षणे आढळल्यास न घाबरता तातडीने डॉक्टरांकडे जा. आवश्यक असलेल्या चाचण्या करा. दरम्यान, बरेच दिवस दम लागत असेल तर छातिचा सिटी स्कॅन करा, असे डॉ. लांडगे यांनी सांगितले आहे. अधिकची लक्षणे असल्यास सरकारी रुग्णालयात जाऊन औषध, गोळ्या घ्या. टाळाटाळ करू नका. फुफ्फुसामध्ये जास्त संसर्ग होण्यापूर्वी उपचार घेतल्यास पुढील त्रास कमी होईल. कोरोना हा 15 दिवस राहतो, असेही त्यांनी सांगितले.
काळजी काय घ्यायची ?
सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, काही अंतराने हात साबणाने धुणे, सर्व प्रकारच्या पाले भाज्या खाणे, अंडी, चिकन, मटण, सोयाबीन खाणे. त्याच बरोबर व्हिटॅमिन सी वाढवण्यासाठी संत्री, मोसंबी, आवळा ज्यूस, डाळिंब खाणे, टोमॅटो खाणे गरजेचे आहे. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढेल आणि कोरोना दूर राहील.
हेही वाचा - Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक