छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections 2025) भाजपानं मोठा विजय मिळवलाय. तर सत्ताधारी आम आदमी पार्टीची (AAP) पिछेहाट झाली. पण भाजपाच्या या विजयावर आता विरोधकांडून टीका होत असल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "दिल्लीच्या निकालात मतांची चोरी झाली की दरोडेखोरी हे तपासलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे व्हीव्हीपॅट द्या. पण भाजपा हे मान्य करत नसेल तर दाल मे कुछ तो काला है. जर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीवर आमची सही करून किंवा शिक्का मारून ती आमच्या हातानं बॉक्समध्ये टाकण्याची परवानगी मिळावी, तर मग आम्ही भाजपाच्या विजयला सलाम ठोकू. माझं मत पडलं की नाही, हेच निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. आम्ही सोन्याची चोरी बघितली. पण मतांची चोरी आज पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळं दिल्लीचा विजय हा ईव्हीमचाच विजय आहे."
धर्माच्या नावावर राजकारण सुरू : पुढं ते म्हणाले, "महाराष्ट्रात जे चित्र होतं, तेच दिल्लीमध्येही बघायला मिळतय. काही वर्षांपूर्वी भाजपाची मागणी होती की ईव्हीएम मशीन बंद करा. मात्र, आता मशीन चांगली कशी झाली? एकतर व्हीव्हीपॅड मशीन हाती घेतली पाहिजे, नाहीतर त्या ईव्हीएम मशीन नागरिकांनी फोडून टाकल्या पाहिजे. त्यांच्याकडून केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे", असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला.
दिव्यांगांना पगार का नाही? : "6 महिने झाले दिव्यांगांचे पगार नाही. रोजगार हमीचे चार महिने पैसे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना मॅसेज केले पण फक्त ओके असे उत्तर येतात. कन्नड तालुक्यात एका दिव्यांग व्यक्तीनं आत्महत्या केली. त्यामुळं आम्ही पिंडदान आंदोलन करत सरकारचा निषेध केला. आम्ही आंदोलन करतो. मात्र, सरकारला काहीच फरक पडत नाही असं दिसून येतंय. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, दिव्यांग पगार रोखल्यास वित्त सचिव यांचं वेतन रोखू. मात्र, असं काहीच झालं नाही," असंही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा -