पुणे - सततच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे या भागातील टोमॅटो पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आधीचा दुष्काळ आणि आता सुरू असलेला संततधार पावसामुळे येथील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि खेड हे तालुके टोमॅटो उत्पादनात अग्रेसर तालुके म्हणून ओळखले जातात. या ठिकाणची नारायणगाव बाजारपेठ ही टोमॅटो विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून जगभरात टोमॅटो पाठवला जातो. मात्र, हाच टोमॅटो पाऊस व वातावरणातील बदलामुळे पडलेल्या रोगराईचा शिकार बनला आहे. त्यामुळे मोठा भांडवली खर्च करुन उभारलेली टोमँटो शेती संकटात आली असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकण्याआधीच कच्चेच झाडांना सडत आहेत. पिकांच्या वाढीसाठी आणि टोमॅटोच्या फुगवणीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मात्र, सध्या खराब हवामानामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने संपूर्ण टोमॅटोची बागच सडून खराब होत आहे.
एक एकर टोमॅटो पिकवण्यासाठी शेती मशागत ठिंबक मल्चिंग लागवड फवारणी यासाठी साधारणता १ लाख ते सव्वा लाखांपर्यत खर्च येतो. मात्र, सध्या लाखो रुपये खर्च करुनही टोमँटोचे पिक शेतकऱ्यांच्या हातातून जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.