परभणी - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला परतीचा पाऊस 300 टक्क्यांहून अधिक बरसला आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
परभणी जिल्ह्यात पावसाची सरासरी 774.19 मिमी एवढी आहे. गेल्या चार वर्षात पावसाने ही सरासरी गाठली नव्हती. मात्र यावेळी भर पावसाळ्यात खंड देणारा पाऊस परतीच्या दिवसांमध्ये जोरदार बॅटिंग करून आपला कोटा पूर्ण करत आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत 101 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या धुवांधार पावसामध्ये पाथरी, सेलू, मानवत आणि पालम या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. तसेच इतर तालुक्यांमध्येदेखील मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील परभणी आणि जिंतूर वगळता सर्वच तालुक्यात शंभर ते सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे. मात्र परभणीत केवळ 72 टक्के तर जिंतूरात 76 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यात पाण्याची परिस्थिती असमाधानकारक आहे.