पालघर - रिक्षात विसरलेली एका महिला प्रवाशाचे पैसे व दागिने असलेली पर्स प्रामाणिकपणा दाखवत परत केली. रिक्षाचालक भगवान माळी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकतेबद्दल पालघर पोलिसांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांचा सन्मान केला आहे.
पालघर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पत्नी पालघर शहरातील एका दागिन्यांच्या दुकानातून आपले मंगळसूत्र दुरुस्ती करून आपल्या मुलीसह रिक्षातून घराकडे निघाल्या. यादरम्यान पैसे व मंगळसूत्र असलेली पिशवी त्या रिक्षातच विसरल्या. आपल्या फ्लॅटवर आल्यानंतर सोन्याचे गंठन आणि हजारो रुपये रोख रक्कम असलेली आपली पिशवी रिक्षातच हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आपले पती सहायक पोलीस निरीक्षक संदीप कऱ्हाळे यांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली. मात्र, त्यांनाही रिक्षा चालकाचा पत्ता लागू शकला नाही.
दरम्यान, रिक्षाचालक भगवान माळी रात्री आपल्या घरी परतल्यावर रिक्षा पार्किंग करत असताना मागच्या सीटवर एक पर्स असल्याचे त्यांना दिसले. ही पर्स आपण क्रिस्टल पार्क येथे सोडलेल्या महिलेची असावी असा तर्क त्यांनी लावला व थेट पालघर येथील क्रिस्टल पार्क परिसर गाठले. मोठे रहिवासी संकुल असल्याने त्यांनी अनेकांकडे विचारपूस सुरू केली मात्र या महिला प्रवाशाचा पत्ता मिळाला नाही. तेथील एका इस्त्री करणाऱ्याने सदर महिला पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याची माहिती देत त्यांनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. महिलेशी संपर्क होताच त्यांना भेटून त्या रिक्षात विसरलेले पैसे व दागिने असलेली पर्स त्यांना परत केली.
रिक्षाचालक भगवान माळी यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाची दखल घेत पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सपोनि कऱ्हाळे यांनी रिक्षाचालक माळी यांचा सन्मान केला. माळी यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व रिक्षाचालकांनी अशीच प्रामाणिकता दाखवावी, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.