पालघर - मोखाडा तालुक्यात अमेझॉन जंगल असल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे या जागेचा विकास करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा घडवून आणू आणि येथील पर्यटन विकास करू, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी मोखाड्यातील सूर्यमाळ येथे दिले. याभागात लीची, स्ट्रॉबेरी आणि आंबा उत्पादन येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ या निसर्ग संपन्न परिसराला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. त्यांनी हा परिसर आवडल्याचे सांगितले. यावेळी विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.
या दौऱ्यात त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड 19 बाबतचा आढावा घेतला. पालघर व वसई ग्रामीण येथे रुग्णांचे प्रमाण तुलनेने जास्त असून वसई व पालघरमधील औद्योगिक वसाहती, रहदारी या गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इतर तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील हिरवळ, स्वच्छ हवा, प्रदूषण विरहित हवामान, भरपूर प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन यामुळे हे प्रमाण कमी असावे, असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना आढवाबाबत बोलताना त्यांनी औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असून औषधाच्या बाबतीत पालघर स्वयंपूर्ण आहे. नागरिकांनी ताप आणि ऑक्सिजन लेवल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. कोविड 19 ची बाधा झालीच तर जनतेने घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.