पालघर - प्रयोगशील शेतकरी नाविन्यपूर्ण शेती करत आहेत. असे आदर्श शेतकरी महाराष्ट्रात तीन ते चार हजार आहेत. त्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना देणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे केले.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे भात उत्पादक शेतकऱ्यांनी गटशेतीने तयार करण्यात आलेल्या रोपवाटीकेला त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
वाडा येथील शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून भात रोपे तयार करुन यांत्रिक पद्धतीने त्यांची लागवड करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी येऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात दीड पटीने वाढ होणार आहे. असे प्रयोग करुन नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाचा अभिमान वाटतो. अशा प्रयोगाने नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरीही राज्यात तीन चार हजार आहेत. हे महाराष्ट्रासाठी आयडॉल आहेत. त्यांचे मार्गदर्शन हे इतर शेतकऱ्यांना दिले जाईल, असे यावेळी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील हमरापूर, येथील औजारे बँक, गांडूळखत व मूरघास प्रकल्प भेटीदरम्यान गावकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. पालकमंत्री भुसे यांनी, औजारे बँक, गांडूळखत प्रकल्प पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना युरिया खाताचे वाटप केले.
यावेळी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, वाडा उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, वाडा तहसीलदार उद्धव कदम आदी उपस्थित होते.