उस्मानाबाद - राज्यात औरंगाबाद नामांतर संदर्भात चर्चा झडत आहेत. भाजपाने औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर करण्यात यायला हवे, असे म्हणत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. तर शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने या नामांतराला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेची याप्रकरणी गोची झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच आता उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्याच्या मागणीला जोर येत असून शहराचे नाव पूर्वीप्रमाणे धाराशिव करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम व जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी निवेदन दिले.
बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील होती इच्छा
निवेदनात म्हटले आहे, की हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान जंगबहाद्दूर सिद्दिकी यांनी इ. स. 1905मध्ये नळदुर्ग शहराचे जिल्ह्याचे ठिकाण हे उस्मानाबाद शहरात हलवून इ. स. 1910च्या दरम्यान धाराशिव शहराला आपल्या नावावरून उस्मानाबाद हे नाव दिले. त्यामुळे आता हे नाव बदलून धाराशिव करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील असंख्य स्थानिक लोकांची साधारण गेली 30 ते 40 वर्षांपासूनची उस्मानाबाद शहराचे नाव पूर्वीप्रमाणे धाराशिव करण्याची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील ही इच्छा होती. त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील नगरपालिका, स्थानिक आमदार, खासदार व राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असून लवकरात लवकर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात यावे, अन्यथा संपूर्ण जिल्हाभर मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी अमर कदम, दादा कांबळेंसह संजय पवार, धर्मराज सावंत, उमेश कांबळे, कुणाल महाजन, सौरभ देशमुख, अक्षय साळवे, वेदकुमार पेंदे, रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.