उस्मानाबाद - जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे खरिपाची पिके पूर्णपणे वाया गेली. मात्र, राज्य सरकार फक्त घोषणाच करत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यापेक्षा सरकार बनवण्यात राज्य सरकार व्यग्र असल्याचा आरोप तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी केला. तसेच सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
हेही वाचा - मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फक्त एक दिवसापुरते सरकार उरले आहे. तरी देखील ते 10 हजार कोटींची घोषणा करत आहेत. असल्या फसव्या घोषणा हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व जाचक अटी रद्द करून सर्वांनाच सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या असून या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राजेंद्र शेरखान, अॅड. धीरज पाटील, प्रकाश चव्हाण, शिवाजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.