नांदेड - तेलंगणातील श्रीराम सागर धरण बहुतांशवेळा बाभळी बंधाऱ्याचे पाणी सोडण्यापूर्वीच भरत असल्याने गोदावरी नदीचे पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सहमतीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केली आहे.
योगा दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेडला आले होते. यावेळी रातोळीकर यांनी बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न त्यांच्या कानी घातला. तेलंगणातील श्रीराम सागर धरण भरण्याच्या आणि बाभळी बधाऱ्याचा पाणी सोडण्याच्या तारखेचा तपशील त्यांच्यासमोर ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशानुसार बाभळी बंधाऱ्यात साठवण करता येणारे पाणी दरवर्षी १ जुलै ते २८ ऑक्टोबरपर्यंत सोडून द्यावे लागते. परंतु, तेलंगणातील हे धरण ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी किंवा शेवटच्या आठवड्यात पूर्णपणे भरलेले असते, असेही आ. रातोळीकर यांनी म्हटले आहे. श्रीराम सागर धरण पाण्याने भरले तरी २८ ऑक्टोबरपर्यंत बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करता येत नाही. परिणामी, श्रीराम सागराकडे पाण्याचा प्रवाह सतत सुरू असतो. नंतर हे पाणी तेलंगणातून समुद्रात सोडले जाते, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष त्यांनी वेधले आहे.

त्यामुळे तेलंगणातील श्रीराम सागर धरण २९ ऑक्टोबर पूर्वी भरल्यास बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याची मुभा मिळावी, अशी तडजोड तेलंगणा सरकार सोबत करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह आ. रातोळीकरांनी धरला आहे. एकीकडे श्रीराम सागर धरणातून अतिरिक्त पाणी समुद्रात सोडले जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील बाभळी बंधा-यात पाण्याचा ठणठणाट होत आहे. केवळ समुद्रात जाणारे पाणी बाभळी बंधारऱ्यात अडविता यावे, अशी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यावेळी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नी संवाद साधून मार्ग काढावा, असा आग्रह आ. रातोळीकर यांनी व्यक्त केला आहे.