नांदेड - दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी आज भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारला पत्र लिहून दूध दरवाढ करण्याची मागणी करण्यात आली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रे पोस्टात टाकण्यात आली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे महादूध एल्गार आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लिहिलेल्या पत्रात गाईच्या दुधाचा दर वाढवून द्यावा तसेच दूध भुकटीला पन्नास रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. शिवाजी पुतळ्या समोरील मुख्य पोस्ट ऑफीस समोर भर पावसात ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सचे पालन करून महादूध एल्गार आंदोलन करण्यात आले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नुसता खुर्च्या खाली करा, दुधाला वाढीव भाव मिळालाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैयक्तिक पत्र पाठवून देखील मुख्यमंत्र्यांनी दखल नाही घेतली तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा भाजप नांदेड महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी दिला दिला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, भाजप महिला युवती अध्यक्ष महादेवी मठपती, मंडळ अध्यक्ष सूर्यकांत कदम, आनंदराव पावडे पुयनीकर, सोशल मीडिया भाजप युवा मोर्चा जिल्हा संयोजक राज यादव, चक्रधर कोकाटे, कृष्णा रत्नपारखी यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.