मुंबई - महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय समाजाचा पूर्णपणे भ्रमनिरास केला. यांच्यापेक्षा भाजप बरा, असे म्हणावे लागेल, अशी खंत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली.
सरकारच्या वर्षपूर्तीमध्ये सरकारने मागासवर्गीयांचा उल्लेख केलाच नाही. सरकारी नोकऱ्यात पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या विषयावर ५ डिसेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहोत. गेल्या ४ वर्षांपासून पदोन्नतीचा हा विषय प्रलंबित आहे. केंद्राचे आणि राज्याचे मिळून 10 लाख कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. या कर्मचाऱ्यांवरचा अन्याय दूर व्हावा, यासाठी हे आंदोलन असणार आहे. सेना, काँगेस राष्ट्रवादीचे सरकार आले मात्र वर्षपूर्ती झाल्यानंतर जाहिरात आल्यानंतर त्यांमध्ये मागासवर्गीय साधा उल्लेखही नाही. मराठा समाजाचे आंदोलन चुकीच आहे. एसईबीसी आरक्षण म्हणजेच ओबीसी आरक्षण आहे. केंद्रानेसुद्धा ही व्याख्या केली आहे. त्यामुळे मराठा समाज हा आता ओबीसीच आहे, असेही राठोड यांनी सांगितले.