मुंबई - मागील 10 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची 'लाइफलाइन' म्हणजेच लोकल ट्रेन जानेवारीच्या 25 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे. याबाबत राज्य सरकार व रेल्वेच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा केली नाही. काही दिवसात अंतिम बैठक पार पडल्यानंतर ते जाहीर करणार आहेत.
लोकल अभावी सामन्यांना अनेक अडचणी
लॉकडाऊननंतर जवळपास सर्वच क्षेत्रे खुली झाली असली तरी मुंबई लोकल ट्रेन अद्याप सर्वांसाठी खुली झाली नाही. त्यामुळे चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल अभावी बेस्ट बस व अन्य वाहतूक सेवांवर ताण येत आहे. त्यातून सोशल डिस्टन्सचा प्रश्नही निर्माण होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
नव्या तारखा दिल्यानंतर आतातरी सुरू होणार का?
राज्य सरकारकडून या लोकल संदर्भात दर 15 दिवसांनी नवीन तारखा दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी 1 जानेवारीला लोकल ट्रेन सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. पण लोकल सुरू केली नाही. रेल्वे प्रशासनाने राज्य प्रशासन लोकल सेवा नियमित करण्यासाठी बैठका घेत असल्याचे आणि चर्चा करत असल्याचे दोन्हीकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच 25 जानेवारी पर्यंत लोकल सर्वांना नियमित करणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत प्रवासी संघटनाना विचारले असता, नवनव्या तारखा दिल्यानंतर आतातरी सुरू होणार का? असा प्रश्न प्रवासी संघटनांच्या पदाधिकारी यांनी उपस्थित केला.
नियम आखत, योग्य नियोजन करून रेल्वे सुरू होईल
सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह राज्य सरकारने वेळोवेळी परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. महिलांनाही प्रवासाची मुभा असला तरी त्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर 1367 तर, मध्य रेल्वे मार्गावर 1774 फेऱ्या चालवल्या जात आहेत. यात आता सर्वांसाठी लोकल नियमित करताना कमी गर्दीच्या वेळात म्हणजे, सकाळी सातच्या आधी आणि रात्री १० नंतर लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच आणखी काही नियम करत कोरोनाची परिस्थिती पाहता सुरु करण्याची देखील शक्यता आहे. याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांना विचारले असता म्हटले की राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यामध्ये चर्चा सुरू आहे. लोकल सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण योग्य नियोजन करत लवकरच निर्णय होईल, असे सांगितले.