मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी इमारती, घरे, भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. यामध्ये अनेकांना जीव गमावावा लागतो. अशाच दुर्घटनामध्ये मागील ६ वर्षात तब्बल ३ हजार ३२३ इमारतींचे भाग आणि भिंत कोसळून २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईमध्ये जुन्या व धोकादायक इमारतीत अनेकजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पुनर्वसनाची ठोस हमी मिळत नसल्याने इमारत खाली करण्यास रहिवासी तयार होत नाहीत. दरवर्षीच्या पावसाळ्यात इमारतीचा भाग, पूर्ण इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामध्ये अनेकांचा जीव जात आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सन २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबईत एकून ३ हजार ३२३ इमारतींचे भाग आणि भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तब्बल २४९ लोकांचा बळी गेलेत तर ९१९ जण जखमी झाले आहेत.
अशा घडल्या दुर्घटना
- २०१३ मध्ये एकूण ५३१ घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये १०१ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचा समावेश होता. तर १८३ लोक जखमी झाले होते.
- २०१४ मध्ये एकूण ३४३ घरांचे भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये २१ लोकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश होता. तर १०० लोक जखमी झाले होते.
- २०१५ मध्ये एकूण ४१७ घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ११ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश होता. १२० लोक जखमी झाले होते.
- २०१६ मध्ये एकूण ४८६ घरे, इमारती कोसळळ्याच्या घटना घडल्या. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये १७ पुरुष आणि ७ स्त्रियांचा समावेश होता. तर १७२ जण जखमी झाले होते.
- २०१७ मध्ये ५६८ इमारती, घरे कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये ६६ जणांचा मृत्यू तर झाला होता. मृतांमध्ये ४४ पुरुष आणि २२ स्त्रियांचा समावेश होता. या दुर्घटनेत १६५ लोक जखमी झाले होते.
- २०१८ मध्ये एकूण ६१९ घरांचे भाग, इमारती कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये १२ पुरुष आणि ३ स्त्रियांचा समावेश होता. तर ७९ जण जखमी झाले होते.